पर्ये : गेल्या तीन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे सत्तरी तालुक्यातील पेळावदा रावण येथील पारंपरिक शेती करण्याऱ्या शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेती पूर्णपणे भिजून उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. येथील यशवंत सहदेव सावंत , रत्नाकांत विष्णू सावंत या शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
यावर्षी वायंगणी भातशेतीचा हंगाम थोडा उशिराने झाल्याने भात कापणीला सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे विलंब झाला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भात कापणी केली असता त्याच रात्री पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सलग तीन दिवस सतत पाऊस पडत असल्याने कापणी केलेले पीक उचलण्याची संधीही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यातच कापलेले भातपीक शेतात राहिल्याने त्यात पूर्णपणे पाणी भरून भात पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे ही मोठी आर्थिक नुकसान झाली.
पेळावदा रावण येथील यशवंत सावंत यांनी सांगितले, की पाऊस नाही याचा अंदाज घेऊन आम्ही भात पिकाची कापणी केली. पण भात कापणी दिवशी जो पाऊस सुरू झाला, तो गेले तीन दिवस अविश्रांत कोसळत आहे. या पावसामुळे कापून ठेवलेले भातपीकही पूर्ण भिजले आहे. तर उर्वरित भात शेतात पडून राहिल्याने ते पूर्ण भिजलेले आहे. त्यामुळे यंदा आमच्या भातशेतीची पूर्णपणे नुकसान झाली आहे. यामुळे आम्हाला सुमारे 30-35 हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने ते हतबल झाले आहे. जमिनीची यंत्राव्दारे मशागत करणे, रासायनिक खते, मजुरी आणि सतत तीन महिने रात्री उपद्रवी वन्यजीवांपासून राखण करणे यासाठी ते बराच खर्च करतात. पण पीक हाताशी आलेले असताना अगदी शेवटच्या वेळी पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तेव्हा सरकारने त्यांना त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.