सांगे, जगातील शेकडो देश आज शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास करीत आहेत. अवघे निष्ठावंत मावळे घेऊन शिवाजी महाराजांनी राज्य केले.
शिवरायांप्रमाणेच धर्मवीर संभाजी राजांनी आपला कारभार करताना धर्माप्रमाणे कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन आजच्या राजकारणी लोकांना प्रेरणा दिली असल्याचे प्रतिपादन समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.
सांगे बसस्थानकावर सांगे, केपे तालुक्यातील शिवगर्जना या संघटनेने आयोजित केलेल्या शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत प्रमुख पाहुणे म्हणून फळदेसाई बोलत होते. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांसमोर सर्वधर्मीय लोक नतमस्तक होतात. शिवजयंतीदिवशीच आपल्यावर भ्याड हल्ला केला असतानाही आपण शिवजयंतीला कलंक लागू नये म्हणून कोणावरही पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली नसल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी आदित्य देसाई म्हणाले की, मराठा साम्राज्याने कुशल संघटक शिवाजी महाराजांमुळे दिल्लीपर्यंत धडक दिली. महाराजांनी शेतकऱ्यांच्या शेतात सोन्याचा नागर फिरविला; पण आज देशातील शेतकऱ्यांच्या घरावर नागर फिरविला जात आहे.
युवकांनी प्रेरणा घ्यावी!
युवकांनी शिवरायांचा एकतरी आदर्श गुण घ्यावा. कोणावरही अन्याय होणार नाही याची सतत काळजी घ्यावी. दाढी वाढविली आणि गाडीवर महाराजांचा फोटो लावला म्हणून कोणी शिवाजी महाराज होत नाही. प्रेरणा मळणाऱ्या सर्वच संत-महंत आणि राजा-महाराजांच्या मिरवणुका होणे आवश्यक आहे, असे मत मान्यवरांनी मांडले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.