वाळपई, सध्या एप्रिल महिना सुरू असून सत्तरीतील ग्रामीण भागाबरोबरच वाळपई शहरातही अनेक भागात पाण्याविना लोकांना हाल सोसावे लागत आहेत. येथील नागरिक हे नळाच्या पाण्यावर अवलंबून असून एप्रिल महिन्यात पाण्याची ही स्थिती असून पुढे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
वाळपई नगरपालिका प्रभाग २, ९ त्याचबरोबर इतर भागातही नळाला अनियमित नळाला पाणी येत असल्याने नागिरक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर सत्तरीतील अनेक ग्रामीण भागात नळ कोरडे आहेत.
सत्तरीत ७० टक्के नळांना दाबोस पाणी प्रकल्पातून पाणी सोडले जाते. तर होंडासारख्या काही भागात पडोसे पाणी प्रकल्पातून पाणी येते. यात गेल्या कित्येक दिवसांपासून वाळपईबरोबर, भुईपाल, सालेली, होंडा, नारायणनगर, वडदेव नगर तसेच इतर भागात पाण्याची कमकरता भासू लागली आहे. काही ठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
दाबोस पाणी प्रकल्पात पाण्याचा भरपूर साठा आहे आणि पाणी सोडण्याचे त्यांचे काम सुरळीत आहे. मात्र, काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत त्यात पाणी भरत नसल्याने नळाला पाणी सोडले जात नाही, अशी माहिती आहे. यावेळी संबंधित दाबोस पाणी प्रकल्पाला भेट दिली त्यावेळी कळाले की दाबोस येथे भरपूर पाणीसाठा असून मे महिन्यातही पाण्याची कमतरता भासणार नाही.
मात्र, टाकीत पाणी का येत नाही याची माहिती काढली असता काही ठिकाणी जलवाहिनीला गळती लागणे, चेंबरमधून पाणी गळती, जलवाहिनी फुटलेल्या अवस्थेत असल्याने याकडे अनेकांचे दुर्लक्ष होताना दिसते. भुईपाल येथे असलेल्या पाण्याच्या टाकीतून भुईपाल, सालेली गावांत पाणीपुरवठा होतो. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून या ठिकाणी नळाला पाणी येत नाही.
कंत्राटदारांचे दुर्लक्ष
वाळपई भागात अनेक ठिकाणी भूमीगत वीजवाहिनी घालण्याचे काम सुरू असून अनेक ठिकाणी नळाजोडणी फोडली जाते. अशावेळी तातडीने दुरुस्ती करणे गरजेची असते. मात्र, याकडे संबंधित कंत्राटदार दुर्लक्ष करत असल्याने पाणी वाया जाते. एका बाजूने नळ कोरडे तर दुसऱ्या बाजूने पाणी वाया जाण्याचा प्रकार सातत्याने होत आहे.
वाढत्या नळजोडण्यांचा परिणाम
यावेळी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दिवसेंदिवस लोकांची वाढती संख्या व नवीन नळजोडणी यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. दाबोस पाणी प्रकल्पात पाणी आहे. मात्र, नळजोडण्या वाढल्याने ही समस्या भासत आहे. मोर्ले-सत्तरी येथे नवीन बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीमुळे हा प्रश्न सुटू शकतो.
हजारो लिटर पाणी वाया
शनिवारी वाळपई-ठाणे मार्गावर भूमिगत वीजवाहिनी घालताना जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यानंतर दुरुस्ती करण्यात आली. यावेळी अनेक भागात पाणीपुरवठा खंडित होता.
वाळपई नवोदय विद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मारिया बार या ठिकाणी गेल्या कित्येक दिवासांपासून जलवाहिनीला गळती लागली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.