पणजी, सध्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. विद्यार्थ्यांनी उष्माघातापासून कसा बचाव करावा, याचे परिपत्रक शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केले आहे. सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे, असेही त्यात बजावण्यात आले आहे.
राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आर्द्रतेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने अंगाची काहिली होत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांवर पोचला आहे. ३४ अंश हे गोव्यातील सर्वाधिक कमाल तापमान मानले जाते. त्यापेक्षा अधिक तापमान वाढल्यास ते उष्णतेची लाट मानली जाते.
काही दिवसांपूर्वी आरोग्य खात्याने वाढत्या तापमानासंदर्भात नागरिकांसाठी सर्वसाधारण स्वरूपाची मार्गदर्शक सूचना जारी केली होती. तिचे पालन करणे हे प्रत्येकावर बंधनकारक नव्हते. मात्र, त्याच मार्गदर्शक सूचनांतील काही भाग घेऊन शिक्षण खात्याने हे परिपत्रक जारी केले आहे. बहुतांश शाळांमध्ये सध्या परीक्षा सुरू आहेत किंवा अंतर्गत परीक्षा संपल्या आहेत.
विद्यालयाच्या प्रमुखावर सोपविली जबाबदारी
सध्या दहावीची परीक्षा सुरू असून काही ठिकाणी महाविद्यालयांचे वर्ग सुरू आहेत. उच्च माध्यमिक विद्यालयांत बारावीचे वर्ग घेतले जात आहेत. त्यामुळे जिथे सध्या विद्यार्थी शाळांमध्ये येतात, त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांना वाढलेल्या तापमानाचा त्रास जाणवू नये, यासाठी उपाययोजना करणे ही जबाबदारी आता विद्यालय प्रमुखावर सोपवली आहे.
आपत्कालीन व्यवस्थापनही सतर्क
राज्यात वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने आरोग्य संचालनालय तसेच गोवा आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारिणीने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आज पणजी येथे कमाल ३४ अंश सेल्सिअस तर किमान २५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.