पणजी: गोमंतक गौड मराठा समाजाचे अध्यक्षपदी विश्वास गावडे यांची शिताफीने नेमणूक केली आहे, ती आम्हाला मान्य नसून या मागे बोलविता धनी वेगळा असून पुढील पंधरा दिवसांत नव्याने निवडणूका घ्याव्यात. जर तसे झाले नाही, तर होणाऱ्या परिणामांना प्रकाश वेळीप आणि विश्वास गावडे जबाबदार असतील, असा इशारा गोमंतक गौड मराठा समाजाचे सभासद रवींद्र वेळीप यांनी दिला.
ते पणजीतील पीएदाद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी गोविंद शिरोडकर, ॲड. उपासो गावकर, रवींद्र गावकर, नीलेश खांडेपारकर व इतर उपस्थित होते. दरम्यान, वेळीप म्हणाले, विश्वास गावडे यांनाच गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष मानायला आम्ही तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.
गोमतक गौड मराठा समाजाची आमसभा आदर्श सभागृह, बाळ्ळी केपे येथे ९ ऑगस्ट रोजी दु. ३ वा. बोलवण्यात आली परंतु २ वाजण्यापूर्वीच आमसभा घेऊन विश्वास गावडेंना अध्यक्षपदी नेमण्यात आले. ही नेमणूक चुकीची असून जे या समाजाचे नाहीत, त्यांचा या मागे हात असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजाची वाताहत केली जात आहे,असा आरोप गोविंद शिरोडकर यांनी केला.
गोमंतक गौड मराठा समाजात कधीच वाद नव्हते. परंतु सध्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण होत आहे. गोविंद गावडेंमुळे या समाजात फूट पडली आहे. विश्वास गावडे यांच्याद्वारे ‘आपण करीन ती पूर्व’, सांगतो तो कायदा, अशी अनेकांची इच्छा आहे. ३ वाजता आमसभा बोलावून त्यापूर्वीच आपल्या मर्जीतला समाजाचा अध्यक्ष करून घेणे हा पर्वरीतील आमच्या पूर्वजांनी जपलेली जमीन बळकावण्याचा डाव आहे. एका समाजाची जमीन घेऊन ती पाच समाजांना देणे कितपत योग्य आमच्या पूर्वजांनी सांभाळलेल्या या जमिनीवर डोळा का ?असा सवाल रवींद्र गावकर यांनी उपस्थित केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.