मुरगाव: उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील माल मुरगाव बंदरातून निर्यात व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोपा विमानतळ हा ‘कार्गो हब’ म्हणून विकसित केला तरी त्याचा फटका बंदराला बसणार नाही. जगात आजही मालवाहतूक ही जलमार्गानेच होते. औषधनिर्मिती उद्योगांसाठी या वर्षीच्या एप्रिलपासून बंदरातून कंटेनर निर्यातीची सोय उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी दोन मोठ्या क्रेन मागवण्यात आल्याची माहिती मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एन. विनोद कुमार यांनी ‘गोमन्तक’ला दिली. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी...
२०१०-११ मध्ये बंदरात ५०.०२ दशलक्ष टनांची माल हाताळणी झाली होती. त्यात लोहखनिजाचा वाटा ४०.६२ दशलक्ष टन तर कोळसा ६.९१ दशलक्ष टन होता. २०२०-२१ मध्ये एकूण मालहाताळणी २१.९९ दशलक्ष टन इतकी खाली आली होती. त्यात लोहखनिजाचा वाटा केवळ ७.३२ दशलक्ष टन आणि कोळसा ९.३४ दशलक्ष टन होता. आता यात थोडी सुधारणा होऊन गेल्या आर्थिक वर्षात मालहाताळणी २०.६२ दशलक्ष टन झाली आहे. मात्र यात लोहखनिजाचा वाटा केवळ ४. ९९ दशलक्ष टन एवढाच आहे. यात सुधारणा होण्याची गरज आहे.
बंदराचे काम हे सुविधा उपलब्ध करण्यापुरते मर्यादित असते. व्यापारात कोणती वस्तू आयात केली जाणार आणि कोणती निर्यात होणार हे व्यापारी ठरवतात. सर्वसाधारणपणे मुरगाव बंदरातून लोहखनिज, स्टील कॉईल्स/स्लॅब्स, मळी, कोल्ड रोल्ड/हॉट रोल्ड कॉईल्स, ग्रॅनाईट, कॉस्टिक सोडा, पिग आयर्न/स्लॅगची निर्यात केली जाते. कोळसा/कोक, चुनखडी, लिक्विड अमोनिया, पीओएल उत्पादने, बॉक्साईट, खते, फॉस्फरिक ॲसिड आणि जिप्सम यांची आयात होते.
सिंगापूर येथील रिसॉर्ट वर्ल्ड क्रुझेस या कंपनीने ३ मार्चपासून मुंबई ते गोवा जलमार्गावर क्रुझसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या हंगामात १३ वेळा ही सुविधा उपलब्ध असेल. पूर्ववत मुंबई गोवा जलमार्गावर बोटसेवा सुरू होण्यासाठी कंपन्यांनी त्यात स्वारस्य दाखवले पाहिजे. २०२२-२३ मध्ये ३१ देशांतर्गत क्रुझ आल्या. त्यातून ५५ हजार ४८५ तर २०२३-२४ मध्ये ३५ क्रुझ आल्या आणि त्यातून ६२ हजार ८०४ प्रवाशांचे आगमन झाले. त्यात आणखीन वाढ होण्याची अपेक्षा आहे.
बंदर इतर भूभागाशी व्यवस्थित जोडले जाणे आवश्यक असते. यासाठी चौपदरी मार्गाची संकल्पना मूर्त स्वरूपात उतरवण्यात आली. या प्रकल्पात बंदर प्राधिकरणाने खर्चाचा ३६.५० टक्के म्हणजे २३५.४५ कोटी रुपयांचा खर्चाचा वाटा उचलला. राज्य सरकारने २१२.२४ कोटी रुपये तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १९६. ४१ कोटी रुपये खर्च केले आहेत. यामुळे वास्को शहरात होणारी कोंडी दूर होण्यास मदत झाली आहे. रस्तेमार्गे बंदरात येणाऱ्या मालाची वाहतूक सुरळीतपणे करणे शक्य झाले. हा प्रकल्प तसा जुना आहे. १९९८ मध्ये वेर्णा ते सडा या १८.३ किलोमीटरच्या रस्त्याचे काम करण्याचे ठरवण्यात आले आणि वेर्णा ते वरुणापुरी या १३.१० किलोमीटर रस्त्याचे काम २००४ मध्ये पूर्ण करण्यात आले. या रस्त्यासाठी खर्च केलेल्या ८० कोटी रुपयांपैकी ४४ कोटी रुपये बंदराने दिले होते.
क्रुझ टर्मिनलचे काम ७६ टक्के पूर्ण झाले आहे. या माध्यमातून तीन हजार जणांना रोजगार मिळणार आहे. टॅक्सी, बॅग हाताळणी, रेस्टॉरंट्स, हाऊस कीपिंग, हस्तोद्योग, हस्तकला या माध्यमातून हा रोजगार असेल. हे आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल आहे. १०१.७२ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. मे महिन्यात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. २०२२-२३ मध्ये १५ आंतरराष्ट्रीय क्रुझमधून ७ हजार ८६ प्रवासी तर २०२३-२४ मध्ये १८ क्रुझमधून १५ हजार ७०० प्रवासी बंदरात उतरले. टर्मिनलनंतर वार्षिक ४० क्रुझ येतील असे नियोजन आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.