महाराष्ट्र : “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट असूनही कर्नाटक सरकारने जाणूनबुजून बेळगावच्या वादग्रस्त भागाचे नाव बदलले आहे. वादग्रस्त भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून गेली कित्येक वर्षे अन्यायाची वागणूक मिळत आहे. त्यामुळे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत विवादित भागाला भाग केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात करणार आहोत”, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प' या शासकीय पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते.
कर्नाटक सीमावाद मिटवण्यासाठी गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरिय समितीची बैठक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. यामुळे सीमावादाचा तिढा सोडवण्याकरिता महाराष्ट्र सरकार पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी आणि कर्नाटकातील मराठी भाषिक लोकसंख्या असलेला भागचा महाराष्ट्रात समावेश करण्याचा मुद्दा उपस्थित करावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. 29 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी सर्वपक्षीय खासदारांना या सूचना दिल्या होत्या.बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून संसदेच्या सभासदांनी राज्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करावे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्रातील मंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुभाष देसाई आदी उपस्थित होते. कर्नाटकाने व्यापलेल्या भागाच्या मुद्दय़ावर आणि तेथील लोकांची महाराष्ट्रात समावेश करण्याची दीर्घकाळची मागणी बघता या विषयावरही खासदारांनी पंतप्रधानांना भेटून चर्चा करावी, असे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन संदेश प्रसारित करताना कर्नाटकव्याप्त मराठी प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला होता. यालाच उत्तर देताना "कर्नाटकची एक इंच जमीनही महाराष्ट्राच्या वाट्याला येऊ देणार नाही",असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कर्नाटक सीमा वादावर भाष्य करताना “मराठी प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सीमालढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मादिनी विनम्र अभिवादन करत आहे. सीमाप्रश्नात सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मे आणि त्यांची निष्ठा, समर्पणात होरपळूनही या लढ्यात धीराने सहभागी असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना मी मानाचा मुजरा करतो. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्यांना आदरांजली असणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत”, असं प्रतिपादन केलं होतं.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.