India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून खेळवला जाणार आहे. पण या सामन्याच्या बाबतीत बीसीसीआयने मोठा बदल केला आहे.
तिसरा कसोटी सामना आता इंदोरला हलवण्यात आला आहे. हा सामना यापूर्वी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होता. पण हे मैदान अद्याप कसोटी सामना खेळवण्यासाठी पूर्ण तयार नसल्याने बीसीसीआयने तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार धरमशाला येथील स्टेडियम कडाक्याच्या हिवाळ्याच्या परिस्थितीमुळे आणि मैदानात पुरेसे गवत नसल्याने पूर्ण विकसित होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्याचमुळे या मैदानात सध्या सामना न खेळवण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.
तसेच रिपोर्ट्सनुसार नुकतेच धरमशाला येथील स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या तज्ञांकडून या स्टेडियमची पाहाणी करण्यात आली होती, त्यानंतर तेथून सामना हलवण्यात आला.
दरम्यान, आता इंदोरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 ते 5 मार्च दरम्यान होणारा तिसरा कसोटी सामना आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरला पार पडला आहे, ज्यामध्ये भारतीय संघाने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.
या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीला 17 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानंतर इंदोरला तिसरा सामना होईल, तर चौथा आणि अखेरचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये पार पडणार आहे.
या कसोटी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तीन वनडे सामन्यांची मालिकाही खेळवण्यात येणार आहे. ही तीन वनडे सामने अनुक्रमे 17 मार्च, 19 मार्च आणि 22 मार्च रोजी मुंबई, विशाखापट्टणम आणि चेन्नई या ठिकाणी होणार आहे.
दरम्यान, भारतीय संघाची अद्याप अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी आणि वनडे मालिकेसाठी निवड झालेली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.