मिलिंद म्हाडगुत
फोंडा शहर व आसपासच्या परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सकाळी पडलेल्या पहिल्या पावसात अनेक ठिकाणी वीज खंडित झाल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. उन्हाळ्यात सुद्धा हे प्रकार सुरूच होते. रात्री अपरात्री वीज खंडित होत असल्यामुळे उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या नागरिकांची ‘आगीतून उठून फुफाट्यात’ अशी अवस्था होत होती.
वीज गायब झाल्यानंतर ज्यांच्याकडे इन्व्हर्टर आहे, तेच या परिस्थितीशी तोंड देऊ शकत होते. बाजारसारख्या फोंड्याच्या भरवस्तीत सुद्धा वीज बत्ती विनाकारण गुल होत असल्याने व्यावसायिकांसमोर एकतर दुकान बंद करून घरी जाणे वा आर्थिक भुर्दंड सोसणे असे दोनच पर्याय राहिलेले दिसत होते. ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिकच बिकट होती. तिथे गेलेली वीज कधी परत येईल याचे उत्तर कोणीच देऊ शकत नव्हता.
परवा झालेल्या पावसात फोंडा तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळी सात वाजता गेलेली वीज दुपारी तीनच्या सुमारास परत आली. त्यामुळे मिक्सर, ग्राइंडर सारख्या विजेच्या उपकरण बंद असल्याने गृहिणींचे हाल झाले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी यात लक्ष घालून या सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाला पावसाळ्यात पूर्णविराम द्यावा, अशी मागणी फोंडा तालुक्यातील ग्राहकांकडून होत आहे.
वीज दर वाढूनही ग्राहकांना त्रास
नुकतेच राज्यातील विजेचे दर वाढले आहेत. पण ग्राहकांना या विजेच्या लपंडावामुळे होणारा त्रास मात्र मागील पानावरून पुढे सुरूच आहे. २४ तास विनाखंडित वीज पुरवठा करणे वीज खात्याला जमत नसेल तर कोणत्या निकषावर दर वाढवतात, असा प्रश्न ग्राहकाकडून विचारला जात आहे.
हा तर फक्त ट्रेलर!
मॉन्सूनपूर्व पावसात ही अवस्था तर ऐन पावसाळ्यात काय होणार ही चिंता अनेकांना आतापासूनच ग्रासायला लागली आहे. गेल्या पावसाळ्यात वारंवार वीज खंडित झाल्यामुळे ग्राहकाना अनंत अडचणीशी सामना करावा लागला होता. त्यात परत विजेचा दाब वाढल्यामुळे फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनरसारखी महत्त्वाची विजेची उपकरणे नादुरुस्त झाली होती. यंदाच्या पहिल्या पावसाळ्यात झालेला विजेच्या लपंडावाचा ‘ट्रेलर’ पाहून या पावसाळ्यात गतवर्षी झालेल्या विजेच्या लपंडावाचा दुसरा अध्याय तर होणार नाही ना, अशी भीती अनेकांना वाटायला लागली आहे.
मॉन्सूनपूर्व तयारी अपूर्णच
पूर्वी पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीज खाते एक दिवस वीज पुरवठा बंद ठेवून पावसाळ्याची पूर्वतयारी करत असे. यात वीज खांबांना लागणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, केबल्स तपासणे, जीर्ण झालेले केबल्स बदलणे, ट्रान्सफॉर्मरची पाहणी करणे इत्यादी प्रकार असायचे. पण गेली दोन-तीन वर्षे झाली अशी पूर्वतयारी दिसून येत नाही. त्याचे फळ मग ग्राहकांना पावसाळ्यात भोगावे लागत आहे.
‘नेमिचि येतो पावसाळा’ हे माहीत असून सुद्धा वीज खाते पावसाळ्यापूर्वीची तयारी करताना कमी पडताना दिसत आहे. वास्तविक ही तयारी त्यांनी नियमितपणे करायला हवी. आज वीज पुरवठ्यावर माणसाचे दैनंदिन जीवन अवलंबून आहे, हे माहिती असूनसुद्धा वीज खाते का सतर्क होऊ शकत नाही?, याचे आश्चर्य वाटते. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी यात लक्ष घालून ग्राहकांची समस्या कायमची तडीस न्यायला हवी.
राम कुंकळकर, अध्यक्ष, फोंडा विकास समिती
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.