Morjim News : उड्डाणपूल होईपर्यंत रस्ता बंद ठेवा; न्हयबाग-पोरस्कडे जंक्शनवर अपघात सुरूच

Morjim News : आमदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांनीही या रस्त्याची पाहणी केली. स्थानिक नागरिक, आमदार, सरपंच अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या; परंतु त्या सूचनांचे योग्य पद्धतीने एमव्हीआर कंपनीने पालन केलेले नाही.
Morjim
Morjim Dainik Gomantak

Morjim News :

मोरजी, राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील न्हयबाग-पोरस्कडे येथील जंक्शन अत्यंत धोकादायक बनले आहे. जोपर्यंत या जंक्शनवर उड्डाण पुलाची सोय होत नाही, तोपर्यंत हे जंक्शन बंद ठेवून वाहनचालकांना पोरस्कडे किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी जागरूक समाज कार्यकर्ते उदय महाले यांनी केली आहे.

हा रस्ता धोकादायक असून येथे उपाययोजना करावी, यासाठी नागरिकांनी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी सिग्नल बसविण्याची मागणी केली होती. शिवाय रस्ता व्यवस्थित बांधण्याचीही मागणी केली होती. परंतु लोकप्रतिनिधींच्या शब्दाला हे अधिकारी जागले नाहीत.

अधिकाऱ्यांनी केवळ एक लाल बत्ती या ठिकाणी पेटत ठेवण्याचे काम केले. राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांनाही हे जंक्शन घातक असून इतर मार्गांवरून येणारी वाहने आणि त्यांचा वेग कळत नसल्याने अनेकदा अपघात घडतात, असे महाले म्हणाले.

आमदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांनीही या रस्त्याची पाहणी केली. स्थानिक नागरिक, आमदार, सरपंच अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या; परंतु त्या सूचनांचे योग्य पद्धतीने एमव्हीआर कंपनीने पालन केलेले नाही. त्यामुळे या रस्त्यावरून समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

‘साबांखा’कडून दिशाभूल :

या धोकादायक जंक्शनवर कोणत्याही प्रकारचे सिग्नल नाहीत. सार्वजनिक बांधकाम खात्याने नागरिकांची खासकरून वाहनचालकांची दिशाभूल करण्यासाठी त्या ठिकाणी एक लाल दिवा लावला आहे, तो नेहमीच सुरू असतो; परंतु दिवा लावल्यानंतरसुद्धा या ठिकाणी दोन चार मोठे अपघात होऊन मनुष्यहानी झाली आहे. यावर आजपर्यंत उपाययोजना केली नसल्याने हा रस्ता रहदारीस घातक बनला आहे.

Morjim
Goa Loksabha Election Result: कळंगुटमध्ये तिसऱ्यांदा कोमेजले कमळ; बार्देशमधील पाच मतदारसंघांनी तारले!

राष्ट्रीय महामार्ग ६६ हा पत्रादेवी ते धारगळ महाखाजन पुलापर्यंत जातो. या रस्त्याचे काम ‘एमव्हीआर’ कंपनी करते. या रस्त्यावर धोकादायक वळणे असून रस्त्याच्या बाजूला संरक्षण भिंती नाहीत. गटार व्यवस्था केलेली नाही. पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणारे वाहनचालक आणि नागरिक, तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोकवस्तीला बराच त्रास होतो. त्याचा अनुभव नागरिक दर पावसाळ्यात फिरतात.

पेडणेहून पत्रादेवीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या न्हयबाग सर्कलवर न वळविता सरळ बगल मार्गावरून गेल्यास निदान पेडण्याहून पत्रादेवीला जाणाऱ्या गाड्यांचा धोका टळेल. त्यामुळे या सर्कलवर पेडण्याहून येणाऱ्या गाड्या बंद करून त्या बगल मार्गावरून वळविणे गरजेचे आहे.

- उदय महाले, समाज कार्यकर्ते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com