बार्देश, शहरातील वाहतुकीवर देखरेख ठेवणे तसेच वाहतुकीला शिस्त लावणे हे वाहतूक पोलिसांचे काम असले तरी म्हापशातील वाहतूक पोलिस कुठेही आडोशाला उभे राहून केवळ तालांव देण्याचे काम तत्परतेने करीत असल्याने चालक, वाहतुकदारांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
सध्या म्हापशात प्रत्येक नाक्यावर तसेच आडवळणार वाहतूक पोलिस उभे असलेले दिसतात. रस्त्यावरील कोणत्याही वाहनाला अडवून हेल्मेट, इन्शुरन्स, आरसीबुक, वाहनचालवण्याचा परवाना आदी कागदोपत्रे तपासण्याच्या नावावर भरमसाठ तालांव आकारला जातो.
वाहतूक नियम मोडल्यास कारवाई झाल्यास काही वावगे नाही, परंतु सरसकट वाहनचालकांना वेठीस धरणे योग्य नाही, असे काही वाहनचालकांनी सांगितले. वाहतूक पोलिस कुठेही आडवळणावर उभे राहून वाहने अडवतात, त्यामुळे वाहतूक धिमी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते, असा शहरातील नागरिकांचा दावा आहे.
वाहतूक पोलिसांनी केवळ दंड देण्यापुरते शहरातील रस्त्यांवर तळ ठोकू नये. शहरात वाहने वाढलेली आहेत. वाहतूक पोलिस वाहने अडवतात, वाहतुकीची गती मंदावते. तसेच कोंडी होते. मात्र अशावेळी वाहतूक पोलिस कधीच वेळेवर पोहचत नाहीत.
-संजय बर्डे, काँग्रेस प्रवक्ते म्हापसा
शहरातील रस्त्यांवर तळ ठोकणाऱ्या वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुधारण्याकडे लक्ष द्यावे.
- सुदेश हसोटीकर, अध्यक्ष, फेरीविक्रेता सेना
शहरात वाहनांची गर्दी असल्याने वाहतुकीबाबत अधिक दक्ष रहावे लागते. अपघाताची शक्यता अधिक असते. ते टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांना ठिकठिकाणी तैनात केले जाते. नियम मोडणाऱ्यांकडून दंड आकारणे हा कारवाईचा भाग आहे,
-मार्लन डिसोझा, वाहतूक निरीक्षक,
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.