सासष्टी, धेंपे कुटुंब हे अनेक पिढ्यांपासून समाजकार्यात आहे. आमच्या कुटुंबाने जात-धर्म न पाहता मंदिरांबरोबरच, चर्च व मशिदींनाही सढळ हस्ते मदत केली आहे व यापुढेही करीत राहणार आहे.
राजकारण हा धेंपे घराण्याचा पिंड नसला, तरी आपली पत्नी पल्लवी धेंपे यांच्या रूपाने धेंपे कुटुंब राजकारणात प्रवेश करीत आहे, तो कुठलाही स्वार्थ साधण्यासाठी नसून केवळ समाजकार्याचे क्षेत्र रुंदावण्यासाठी, असे श्रीनिवास धेंपे यांनी दैवज्ञ समाजाने आयोजित केलेल्या सभेत सांगितले.
दैवज्ञ समाजाने आपला पाठिंबा दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपे व उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांना जाहीर केला. या सभेला भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे उपस्थित राहणार होत्या, पण गृहमंत्री अमित शहा यांच्या म्हापसा येथील सभेला जावे लागल्याने त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्यावतीने श्रीनिवास धेंपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मडगावचे आमदार दिगंबर कामत, दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष रामराव लोटलीकर, उल्हास वेर्लेकर, मनोहर रायकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीनिवास धेंपे म्हणाले, की पल्लवी धेंपे निवडून आल्यावर जो खासदार निधी मिळतो, त्याचा योग्यप्रकारे विनियोग करण्याचा निर्धार त्यांनी पूर्वीच केला आहे. तसेच धेंपे ग्रुपतर्फेही जास्त निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आम्ही जे आश्र्वासन देतो त्याची पूर्तता करीत असतो. केंद्र सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पल्लवी निश्र्चितच प्रयत्न करणार आहे.
समाज शिक्षित असल्यास देशाची प्रगती जास्त प्रभावीपणे होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी समाज सुशिक्षीत करण्यासाठी झटत आहेत. मोदी यांनी ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या केवळ सामान्य व्यक्तीवर लक्ष केंद्रीत करूनच तयार केल्या आहेत, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. याप्रसंगी सोनाली नागवेकर, माधव बांदोडकर, भाई नायक यांनीही आपले विचार मांडले. सुत्रसंचालन वल्लभ रायकर यांनी केले.
‘पल्लवींच्या प्रयत्नांना पाठबळ द्या’
पल्लवी धेंपे यांच्यावर होत असलेल्या अनेक टीकांना समर्पक उत्तरे देताना ते म्हणाले, की पल्लवी भर उन्हात प्रचार कार्य करीत आहे. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत न थकता प्रचारकार्य करीत आहे. गेली अनेक वर्षे समाजकार्य करीत असून समाजकार्याबरोबरच त्या राजकारणात प्रवेश करीत आहेत. तेव्हा सर्वांनी त्यांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन व पाठबळ द्यावे.
विश्वगुरूचे स्वप्न मोदीच साकारणार ः कामत
पंतप्रधान मोदी यांनी दोन नव्या योजना चालू करण्याचे आश्र्वासन दिले आहे. ७० वर्षांवरील सर्व नागरिकांना वैद्यकीय खर्च केंद्र सरकारामार्फत दिला जाईल. सामन्यांना घर बांधणीसाठी किंवा घर दुरुस्तीसाठीसुद्धा सरकारतर्फे अनुदान दिले जाईल.
भारताचे विश्र्वगुरू होण्याचे स्वप्न केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वच साकार करू शकेल, असेही कामत यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.