पणजी, राज्यातील सात धरणांपैकी महत्त्वपूर्ण असलेली साळावली, गावणे आणि चापोली या तीन धरणांतील जलसाठा वाढला असून तो निम्म्यावर पोहोचला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन-तीन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे.
तिळारी धरण महाराष्ट्रात येत असले तरी तेथून गोव्यातील पेडणे व बार्देश तालुक्यासाठी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथील पाणीसाठ्याचीही नोंद जलस्रोत खात्याला ठेवावी लागते. जलस्रोत खात्याकडील नोंदीनुसार साळावली धरणाचा पाणीसाठा ५२ टक्के इतका वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात २३ जून रोजी ६८४.८ मि.मी. पाऊस नोंद झाला होता तर २९ रोजी ९३१ मि.मी. पाऊस पडला.
यावरून मागील सात दिवसांत पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यापाठोपाठ चापोली ५६ टक्के तर गावणे धरण ६८ टक्के इतके भरले आहे.
अंजुणे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठा २२ टक्के इतका वाढला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर काही दिवसांतच या धरणातील जलसाठा ५० टक्क्यांवर जाईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, सध्या तिळारी आणि साळावली धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. तिळारी धरणातून ३३.९० क्युमेक्स तर साळावली धरणातून २.५० क्युमेक्स पाणी नदी पात्रात सोडले जातेय.
राज्यातील धरणांतील जलसाठा
६८ % गावणे
५६ % चापोली
४८ % आमठाणे
२२ % अंजुणे
५२ % साळावली
३९ % पंचवाडी
३० % तिळारी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.