मान्सून सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना देशभरातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. राज्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात राज्यातील पर्यटक हंगाम बंद असतो त्यामुळे मेच्या अखेरीस मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात हजेरी लावत असतात.
गोव्यात शेजारील महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमधील पर्यटक दाखल झाले आहेत. पावसाळ्यात बीच शॅक, वॉटर स्पोर्ट्स, समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनासंबधित येणारे निर्बंध यामुळे मेच्या अखेरीस गोव्यात देशी-विदेशी पर्यटक येत असतात.
गोव्यातील नयनरम्य आणि शांत समुद्रकिनारे तसेच नाईटलाईफचा आनंद घेण्यासाठी देशभरातील पर्यटक गोव्यात येतात. पावसाळ्यात अशा अनुभूतीचा आनंद घेता येत नाही, असे मत एका पर्यटकाने नोंदवले.
दरम्यान, हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्याने जीवरक्षक संघाने पर्यटक तसेच स्थानिकांना समुद्रकिनाऱ्यांवर भेट देताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान खात्याने राज्यात गुरुवारी येलो अलर्ट जारी केला असून, विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर विशेष काळजी घेण्याची सूचना केलीय. तर, वॉटर स्पोर्ट्स किंवा धोकादायक खेळ प्रकारात सहभाग न घेण्याचे आवाहन केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.