पणजी :
सिंधुदुर्गात वास्तव्य, मात्र, इयत्ता दहावी व बारावीमध्ये गोव्यात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी गोव्यात जाण्याची गरज नाही. गोवा शालान्त मंडळाने व सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातच विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत. याबाबतचे परिपत्रक आज गोवा शिक्षण मंडळाने जारी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा शिक्षण विभागाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा रखडल्या होत्या. मात्र, मुलांच्या भवितव्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या परीक्षा घेण्याचे निश्चित केले. कोरोनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्याना टाळेबंदीमुळे गोव्यात जाऊन परीक्षा देणे अवघड बनले होते. टाळेबंदीत दोन्ही राज्यांच्या सीमा बंद असल्याने विद्यार्थ्याना किमान ई पास तरी द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि पालकवर्गातून होत होती. याची प्रक्रियाही सुरू झाली होती. मात्र, गोवा राज्य शासनाने त्याही पुढे जात या विद्यार्थ्याची परीक्षा सिंधुदुर्ग मध्येच देण्याची सोय दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात करण्यात आल्याचे पत्र गोवा शिक्षण विभागाने आज प्रसिद्ध केले. याबाबतची माहिती दोडामार्गचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली. याप्रश्नी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली व सावंतवाडी उपसभापती शितल राऊळ यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले.
|