वाळपई, आपली लुप्त झालेल्या पुरण शेतीला पुन्हा नवी संजीवनी देण्याचे काम डॉ. प्रकाश पर्येकर व त्यांच्या ग्रामस्थांनी केले असून धावे-तार येथे भात कापणीचा शुभारंभ करण्यात आला. या मातीत सोने उगवते आणि सेंद्रीय पद्धतीने भाताची लागवड केल्याने आरोग्यासाठीसुध्दा खूप फायद्याचे आहे.
पुरणशेती विस्तारणाऱ्यांसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आवाहन गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांनी सत्तरी येथे केले.
धावे-तार सत्तरी येथील दुऱ्याची कोंड येथे म्हादई नदीच्या तिरावर विस्मृतीत गेलेली पुरण शेती बहरून शेकडो वर्षाचे तिचे वैभव नव्या युवा पिढीला पाहता यावे, यासाठी संशोधक तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना पुरणशेतीचा सखोल अभ्यास करता यावा, या उद्देशाने डॉ. प्रकाश पर्येकर यांनी पुढाकार घेऊन हा प्रात्यक्षिक तत्त्वावर गेल्या पाच महिन्यापासून अथक परिश्रमाने सदर पुरण शेतीचा उपक्रम राबविला.
आईसीएआर- जुने गोवेचे संचालक डॉ. प्रवीण कुमार, गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम, कोकणी अध्ययन शाखेचे संचालक डॉ. हनुमंत चोपडेकर, रसायनशास्र महाशाळेचे उपअधिष्ठाता प्रो. सुंदर धुरी, मनोहर परिकर स्कूल ऑफ लॉ, गवर्नन्स आणि पब्लिक पॉलिसी महाशाळेचे अधिष्ठाता प्रो. राजेंद्र गाड, सत्तरीचे विभागीय कृषी अधिकारी श्री. विश्वनाथ गांवस, पुरण शेतीत प्रत्यक्ष काम करणारे गणेश पर्येंकर, तुळशिदास गांवकर, विठोबा पिंगळे, गोपिनाथ गावस, विनय बापट तसेच राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य, संशोधक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व त्या भागातील पुरण शेतकरी उपस्थित होते.
डॉ. प्रदीप सरमोकादम म्हणाले, जैवविविधता मंडळाकडून आत्तापर्यंत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले
आहे. मात्र पुरणशेतीचा हा प्रकल्प खरोखरच उल्लेखनीय आहे. ही शेती टिकली पाहिजे. त्यासाठी आपले सहकार्य राहणार आहे.
अधिक संशोधन होणार!
गोव्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात पुरणशेती केली जायची, मात्र कालांतराने ही पुरणशेती लुप्त होत चालली होती. गेल्या २० वर्षापासून खंडित झालेली ही शेतीला पुर्नजीवीत करून डॉ. पर्येकर यांनी आशेचा किरण येथील शेतकरी वर्गांना दाखविली आहे.
या मातीत सोने उगवते. आम्ही यावर संशोधन करणार असून मातीचे परीक्षण करून यापुढे ही शेती कशा प्रकारे विस्तारीत केली जाईल, त्याचबरोबर भाताचे नमुने घेऊन पुरण शेती कशा प्रकारे लागवड केली तर किती पीक मिळू शकते, यावर सविस्तर अभ्यास करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत, डॉ. प्रवीण कुमार यांनी सांगितले.
५५४ शेतकरी :
सावर्डे, नगरगाव, खोतोडा, गुळेली, उसगाव यात म्हादई, रगाडा, वेळुस, वाळवंटी अशा अनेक गावात शेतकरी पुरणशेती करीत होते. एकूण ५५४ शेतकरी ही शेती करायचे व वायंगणी शेती पेक्षा ३ पट म्हणजे सुमारे ४० हेक्टर पुरणशेती लागवडीखाली येत होती. वेळगे, धामशे व सावर्डे येथे अधिक पिक घेतले जात होते. त्यावेळी सत्तरीत दुग्ध व्यवसायही मोठ्या प्रमाणात उत्पादन होता. कारण गुरांसाठी पुरेसे गवत, खाद्य मिळते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.