पणजी,
वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सहा मित्र... त्यांना पहिल्यापासूनच समाजातील गोरगरिबांना मदत करण्याची प्रबळ इच्छा होती. स्वत:च्या खिशातील शे-दोनशे काढून गरजवंतांना वेळप्रसंगी मदतही केली. या मदतीची व्यापक गरज लक्षात घेत त्यांनी ‘रेहमा’ नावाची संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ते जात - पात, धर्म, असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता गरजवंताला मदत केली. मैत्रीची मिसाल कायम ठेवत हा समूह माणुसकीचा संदेश समाजाला देत आहे.
ॲमेझॉनचे पार्सल पोहोचविण्याचे काम रफिक नदाफ करतात, तर नवाज खान आणि गुफरान खान हे शाळांच्या गाड्या चालवितात. तसेच इस्माईल कताल, तौसिफ शेख आणि मुहम्मंद फैजान अबू मुहम्मंद यांचाही या समुहात समावेश आहे. ‘रेहमा’ संस्थेच्या मदतीसाठी त्यांनी काही दिलदार लोकांना एकत्रित केले असून त्यांच्याकडून जमेल तशी उदा. १०० रुपये जरी गरज असली, तरी मदत घेत ते गरजूंपर्यंत मदत पोहोचवितात. मागील वर्षी आलेल्या पुरामध्येही गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांना अन्नपाण्याच्या पुरवठ्यासह घरे बांधून देण्यासही मदत केली आहे.
...आणि तो शिकू लागला!
फोंडा येथील एका मुलाला बारावीमध्ये ८४ टक्के गुण मिळाले होते. पुढे शिकण्याची इच्छा असूनही घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याला पुढील शिक्षण घेणे शक्य नव्हते. शिक्षण अर्ध्यावर सोडून पोटापाण्यासाठी त्याला कामावर जाण्याची वेळ आली. मात्र, ‘रेहमा’ संस्थेच्या मदतीने आज तो त्याचे शिक्षण पूर्ण करीत आहे. याशिवाय कर्नाटकातील एका दृष्टिहीन जोडप्याचीही मदत या संस्थेने केली. समाजात अशा अनेक मुली आहेत, ज्यांना त्यांचे शिक्षण घेता येत नाही, शिवाय काही महिलांना त्यांचे नवरे सोडतात, किंवा त्या बेघर होतात, अशा महिलांसाठी निवास सुविधा सुरू करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
कोट करणे०००
माणूस भुकेला असला की, त्याला मदत करणे, हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. आम्हाला वाटते की, जर जमिनीवर असणाऱ्या गरजवंताला आपण मदत केली, तर देवही त्याची दखल निश्चितच घेईल. मृत्यू झाल्यानंतर स्वर्गात आपल्या पाप-पुण्याईची मोजदाद होईल, अशी त्यांची भावना आहे. पुण्यकर्म संचय करण्यासाठी आपण गरजवंतांना मदत केलीच पाहिजे, असा भावनिक संदेश या बांधवांनी दिला.
|