पणजी,
गोव्यात येणाऱ्या म्हादईच्या पाण्याची पातळी खूपच कमी झाली आहे. यासंदर्भात राज्यापालांशी चर्चा करून त्यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. येत्या मे महिन्यात हे पाणी गोव्यात वाहून येण्याची शक्यता कमी झाली आहे. गेल्या काही वर्षापासून पर्यावरणप्रेमी व तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भिती सत्यात उतरत आहे असे मत मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आमदार ढवळीकर म्हणाले की, जगात व देशात आलेल्या ‘कोविड-१९’ या महामारीमुळे गोमंतकिय म्हादई पाणीप्रश्नाबाबत विसरले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरापासून २ ते ५ किलोमीटर अंतरावर वाठारदेव हा कृषी भाग आहे. या भागातून म्हादईचे पाणी वाहत होते तेव्हा सुमारे एक मीटर खोल होते मात्र आता तर ती खोली एक फूटवर आली आहे. सगळ्यांचे लक्ष ‘कोविड-१९’ कडे असताना कर्नाटकात म्हादई नदीवरील प्रकल्पांचे काम सुरूच आहे. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पाण्याची पातळी घटत आहे. यापूर्वी केंद्र सरकारने तिन्ही राज्यांना बरोबर घेऊन कळसा भंडुरा येथील प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी समिती नेमली होती मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे राज्य सरकारने म्हादईबाबतही गंभीर विचार करण्याची गरज आहे असे आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले.
|