वाळपई
गेल्या दीड महिन्यांपासून देशातील नागरिक टाळेबंदीत जीवन जगत आहेत. टाळेबंदी असली तरीही दररोज जगण्यासाठी घरात अन्न असणे आवश्यक आहे. गोवा सरकारने काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महिना दोन हजार रुपये दिले जातात, पण सत्तरी तालुक्यातील ठाणे गावातील ७० वर्षीय ज्येष्ठ महिला अन्नपुर्णा परवार यांना गेल्या सात महिन्यांपासून या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ऐन टाळेबंदीत या एकाकी असलेल्या महिलेचे जगणे अंधकारमय बनले आहे.
गेल्या वर्षी गणेशचतुर्शीनंतर या योजनेचे पैसे वाळपई येथील संबंधित बँकेत येणे बंद झाले आहे. याविषयी या महिलेने बँकेत जाऊन विचारणा केली, पण पैसे येत नसल्याचे सांगण्यात आले. नागरिक आधीच कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना ज्येष्ठ महिलांची अशी फरफट होत आहे. ही महिला गेली दहा बारा वर्षे या योजनेचा लाभ घेते आहे, पण काही महिन्यांपूर्वी याबाबत सरकारने सर्वेक्षणाचे काम केले होते. त्यावेळी या महिलेच नाव काढण्यात आले. त्याविषयी खुलासा करणारे एक पत्र २ फेब्रुवारी रोजी संबंधित खात्यामार्फत तिला पाठविण्यात आले. त्या पत्रात स्पष्टीकरण देताना या महिलेने सर्वेक्षणावेळी सर्वेक्षण अधिकारी वर्गाला सहकार्य केले नाही असे म्हटले आहे. त्यामुळे पैसे येत नाही. ही गोष्ट म्हणजे अत्यंत दुर्दैवी असून सरकारी अधिकारी वर्गाचा बेजबाबदारपणाच म्हणावा लागेल असे नागरिक बोलत आहेत. सहकार्य केले नाही म्हणजे नेमके काय केले हे मात्र कोडेच आहे. वास्तविक सर्वेक्षणावेळी या योजनेचा लाभार्थी जीवंत आहे की नाही हे पहाणे जरुरीचे असते. ठाणेच्या अन्नपुर्णा परवार यांनी याआधी योजनेचा लाभ घेतलेला असताना देखील तिला गेले सात महिने पैसे येत नाही हे संतापजनकच आहे.
|