अवित बगळे
पणजी :
राज्याचे पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग (आयपीएस) यांची दिल्ली येथे बदली झाली आहे. गेल्या अडीच वर्षाहून अधिक काळ ते या पदावर होते. राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांचे गेल्या वर्षीच्या अखेरीस निधन झाल्यानंतर महानिरीक्षक जसपाल सिंग यांच्याकडे महासंचालक पदाचा तात्पुरता ताबा दिला होता. गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ हे महासंचालक पद रिक्त होते. यावर्षी जानेवारीच्या सुरवातीलाच त्यांना गोव्यात दोन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची बदली होणार होती. मात्र देशात ‘कोविड-१९’ ची टाळेबंदी लागू झाली आणि नवीन पोलिस महासंचालकांची नियुक्ती बारगळली होती. राज्यात टाळेबंदीच्या काळात त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा भार सांभाळताना यशस्वी कामगिरी बजावली होती.
दरम्यान, जसपाल सिंग यांनी सांगितले की, महानिरीक्षक म्हणून काम करताना जनतेचे मोठे सहकार्य लाभले. बहुतांश गोमंतकीय समाज शांतताप्रिय असल्याने हिंसक वातावरणाला सामोरे जावे लागले नाही. सुशिक्षित समाजात लोक आपल्या हक्कांविषयी आणि कायद्यांविषयी सजग असल्याने पोलिसांचे काम वाढलेले असते, त्याचा अनुभव गोव्यात आला. कोकण रेल्वेला लोकांनी विरोध केला होता त्याच रेल्वेचे फायदेही लोक अनुभवत आहेत. पर्यावरणाविषयी संवेदनशील असतानाच पर्यायांचा विचार करण्याची मानसिकताही दाखवायला हवी.
- महेश तांडेल
|