अवित बगळे
पणजी :
राज्य सरकारने गोव्याचे काजू, मानकुराद आंबा, खतखते, गोमंतकीय मासळीची आमटी व भात (गोमंतकीय जेवण) आणि ताळगावच्या वांग्याला भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान संचालक लेविनसन मार्टिन्स यांनी ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या उत्पादनांची वैशिष्ट्ये संकलीत करण्याचे काम सध्या सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर मानांकनासाठी दावा सादर केला जाणार आहे.
गोवा विज्ञान व तंत्रज्ञान परिषद या कामासाठी सरकारने नियुक्त केली आहे. या मंडळाचे सदस्य सचिव प्रा. प्रदीप मोरजकर आणि समन्वयक अधिकारी दीपक परब हे या प्रकल्पांवर काम करत आहेत. आजवर राज्यातील काजूची फेणी, खोला येथील मिरची, हरमलची मिरची, मयंडोळी केळी आणि खाजे यांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
मानांकनासाठी प्रक्रिया
‘जीआय' मानांकन मिळविणे सोपे नसून, त्याच्या ऐतिहासिकतेचे पुरावे चेन्नईमधील ‘जीआय’ नोंदणी कार्यालयात दाखल करावे लागणार आहेत. जनतेशी संवाद साधून यासाठी लागणारी माहिती गोळा केली जात आहे. मिळालेल्या माहितीचे वर्गीकरण, त्याचे शास्त्रीय सादरीकरण याची तयारी करावी लागणार आहे. हे मानांकन मिळाल्यास त्यांचे ब्रॅंडिंग, वितरण करणे सोपे जाणार असून, बनावटपणालाही आळा बसणार आहे.
विपुलता, समृद्धताही आवश्यक
राज्यातील विपुल आणि समृद्ध पीक समृद्धता लक्षात घेता सुमारे काजूसाठी भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक वैशिष्ट्ये असलेल्या या उत्पादनांची ओळख जपण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठीच त्यांना भौगोलिक मानांकन मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
गुण वैशिष्ट्यांमध्ये वेगळेपणा हवा
भौगोलिक निर्देशांक (जीआय) ही उत्पादनासाठी वापरण्यात येणारी एक विशिष्ट ओळख आहे. विशिष्ट भूगागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे शेतमालाला रंग, वास, चव, आकार आदी गुण वैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. यावरून त्या उत्पादनाची ओळख ठरते. ही ओळख ठरल्यानंतर त्या उत्पादनाच्या गुणवत्तेला जागतिक मान्यता प्राप्त होते. या उत्पादनाचा दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचाही समावेश यामध्ये होतो.
संपादन : महेश तांडेल
|