Goa Airport: गोव्यात हवाई वाहतुकीशी संबंधित एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. लंडनहून गोव्यात दाखल झालेल्या विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले, पण विमान जमिनीवर धावत असताना पायलट ते दुसऱ्या ठिकाणी पार्किंगसाठी घेऊन गेला.
दरम्यान, हवाई वाहतूक नियंत्रकाने त्याला दुसऱ्या पार्किंगमध्ये जाण्याची सूचना केली होती. पायलटच्या या निष्काळजीपणामुळे विमानात बसलेल्या शेकडो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
सुमारे 2 महिने जुन्या या घटनेची DGCA कडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी पायलटवर मोठी कारवाई होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
घटनेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI-146 गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी रात्री 8.21 वाजता लंडनहून गोव्यात येण्यासाठी रवाना झाले होते.
बोईंग 787 ड्रीमलायनर विमान व्हीटी-एएनक्यू विमान पायलट कॅप्टन ऋषी कुमार शर्मा उडवत होते. रात्रभर उड्डाण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.40 वाजता विमान गोवा विमानतळावर उतरले.
लँडिंगनंतर पायलटला ए-2 टॅक्सीवेवरून विमान वळवण्यास सांगितले होते, पण त्याआधी पायलट ए-3 टॅक्सीवेकडे वळला. विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरला विमान दुसऱ्या दिशेने जाताना दिसले तेव्हा त्यांनी तात्काळ वायरलेसद्वारे 'A-2 मधून जा' असा इमर्जन्सी संदेश दिला. यावर 'मी टर्न घेतला आहे,' असे पायलटने उत्तर दिले.
सुदैवाने विमानाने चुकीचे वळण घेतल्यानंतरही कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. आता या घटनेच्या सुमारे 2 महिन्यांनंतर, या प्रकरणाची तक्रार महासंचालक नागरी विमान वाहतूक (DGCA) यांच्याकडे करण्यात आली आहे.
तपासानंतरच घटनेची संपूर्ण माहिती समोर येईल. या प्रकरणात दोषी आढळल्यास पायलटवर कारवाई होऊ शकते, असे मानले जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.