नावेली
सध्या समुद्र अद्याप खवळलेला असल्याने तसेच काही ट्रॉलर मालकांनी यावेळी कोरोना मुळे एक महिना उशिरा १ सप्टेंबर पासून मासेमारीला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कुटबण जेटीवरुन एकही ट्रॉलर समुद्रात मासेमारीसाठी गेलेला नाही. परंतु १५ ऑगस्टनंतर मासेमारीला सुरुवात होण्याची शक्यता कुटबण फिशरीज सोसायटीचे अध्यक्ष विनय तारी यांनी व्यक्त केली.
फिशिंगसाठी जाण्यास आतापर्यंत कुटबण जेटीवर केवळ पाच टक्के खलाशी जेटीवर पोहचले असून ते आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांमधून आले आहेत, असे तारी यांनी सांगितले.
खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मासेमारीसाठी गोव्यात येणाऱ्या खलाशाना राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागत असल्याने काही खलाशी कामगारांना अडचणी निर्माण होत असल्या तरी मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील चार पाच दिवसांत खवळलेला समुद्र शांत होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून १५ ऑगस्टनंतर मासेमारीला समुद्रात जातील, असे तारी यांनी सांगितले.
|