फोंडा: केंद्र सरकारच्या माध्यमातून गरजवंतांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून राज्यात विविध योजना खुल्या करण्यात आल्या असून गोव्यालाही त्याचा लाभ झाला असल्याचे उद्गार फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी काढले.
कोविड महामारीच्या काळात राज्य सरकारचे नागरी पुरवठा खाते तसेच भारतीय खाद्य निगमने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आज (शनिवारी) भारतीय खाद्य निगम मंडळ गोवा विभागातर्फे देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवी नाईक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच राज्य सरकारच्या नागरी पुरवठा खात्याचे संचालक सुधीर केरकर, महिला आणि बाल कल्याण खात्याच्या संचालिका दीपाली नाईक व भारतीय खाद्य निगमचे गोवा विभाग व्यवस्थापक घनशाम महाले आदी उपस्थित होते.
सुधीर केरकर यांनी कोविड महामारीच्या काळात गोव्यात सार्वजनिक वितरण सेवेंतर्गत गरजवंतांना मोफत धान्य पुरवठा सुरळीत झाला. राज्य सरकारच्या नागरी पुरवठा खात्यातर्फे राज्यातील गरजवंतांना अनेक लाभ मिळवून देण्यात आले असून यापुढेही असे विधायक उपक्रम सुरूच राहतील, असे सांगितले.
दीपाली नाईक यांनी भारतीय खाद्य निगमच्या उपक्रमाचे कौतुक करून लाभार्थीपर्यंत धान्य पोचवण्यासाठी चांगले प्रयत्न झाले, त्यामुळेच कोविड महामारीच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला असल्याचे नमूद केले. घनशाम महाले यांनी स्वागत व प्रास्ताविक करून आभार मानले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.