नवी दिल्ली : ‘‘नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध सरकार कारवाईचा बडगा उगारत आहे. मात्र आम्ही मागे हटणार नाही. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल. यात सुमारे एक हजार ट्रॅक्टर सहभागी होतील,’’ असे शेतकरी नेत्यांनी काल स्पष्ट केले.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) करण्यात येणाऱ्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. याविरुद्ध आणि कायदेशीर मार्गाने लढा देऊ. शेतकरी झुकत नसल्याने सरकार अत्याचार करत आहे, असा आरोप शेतकरी नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. शेतकरी आंदोलनाचा काल ५३ वा दिवस होता. पत्रकार परिषदेत स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव म्हणाले, ‘‘प्रजासत्ताक दिनी बाह्य दिल्ली वर्तुळाकार मार्गावर तिरंग्यासह ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कोणताही अडथळा आणण्यात येणार नाही.’’
यावेळी किसान क्रांतिकारी युनियनचे प्रमुख दर्शन पाल म्हणाले, ``शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या अथवा पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध एनआयएने कारवाई सुरू केली आहे. सर्व शेतकरी संघटना याचा निषेध करतो.``
शेतकऱ्यांबरोबर उद्या पुन्हा चर्चा
केंद्र सरकारने आतापर्यंत दहा वेळा शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आहे. पुढील चर्चा मंगळवारी (ता. १९) होणार आहे. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहे. तर दुसरीकडे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांशी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यात येईल व कायदे रद्द करण्याव्यतिरिक्त काय पर्याय आहेत, याची माहिती दिली जाईल, असे म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.