Konkani language
Konkani languageDainik Gomantak

हरवलेले शब्द हरवलेली संस्कृती

भाषा कोंकणी किंवा मराठी असली तरी जुन्या आणि नव्या पिढीत भाषिक आकलनाच्या दृष्टीने अंतर पडलेले आपल्याला दिसून येईल.

सखाराम बोरकर

भाषा म्हणजे केवळ अक्षरांचा निर्जीव समूह नाही. त्यामागे असते परंपरा. संस्कृती. ह्या परंपरा लुप्त पावल्या की त्यांच्याशी निगडीत शब्दही हरवले जातात. खरे तर पिढ्यान पिढ्या जगण्यातून हे सगळे शब्द भांडार तयार झाले आहे आणि होत रहाणार.

कुठलीही भाषा अखंड प्रवाहीत ठेवायची असेल तर त्यात नव्या शब्दांची भर पडणे आवश्यक तशेंच अपरिहार्य आहे. झरा वाहता असतो तेव्हांच तो निर्मळ असतो. जिवंत असतो.

भाषा आणि संस्कृती यांचे एक वेगळे नाते आहे. त्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. भाषेशिवाय समाज आणि भाषेशिवाय संस्कृतीचा आपण विचारच करुं शकत नाहीं. भाषेने समाज आणि त्याच्या संस्कृतीला आणि समाजाने, संस्कृतीने भाषेला खूप काही दिलें. काळानुसार लोकव्यवहार बदलतात.

ते अभिव्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज भासते, जे प्रचलित भाषेत नसतात. मग नवे शब्द निर्माण होतात. ह्या बदलाची प्रक्रिया जास्त वाढली की भाषेचे रूप बदलण्याचा कल वाढतो.

फ़क्त आपल्या मराठी आणि कोंकणी भाषाचा विचार केला तर ह्या भाषात किती तरी नवीन शब्द आले आहेत. नविन तंत्रज्ञान आणि मोठ्या वेगाने होणाऱ्या आधुनिकीकरणामुळे कित्येक शब्द आणि त्या शब्दांमुळे सुचीत होणारे सामाजीक संदर्भ हरवत चाललेले आहेत.

भाषा कोंकणी किंवा मराठी असली तरी जुन्या आणि नव्या पिढीत भाषिक आकलनाच्या दृष्टीने अंतर पडलेले आपल्याला दिसून येईल. ह्या कारणामुळें व आधुनिक जीवन शैलीमुळें मराठी-कोंकणीतले पुष्कळसे शब्द आपण कधींच उपयोगांत आणत नाही. त्यामुळे हे शब्द व त्यातून प्रकटणारे संकेत लुप्त होत चालले आहेत ह्याचा आपल्याला पत्ताच लागत नाही.

उदाहरणार्थ एक तराजू (तागडी) आला आणि ह्या तराजूने नवे शब्द दिले तसेच तराजू येण्यापूर्वी जे शब्द होते ते खाऊन टाकले. ह्या तराजूने आम्हाला ''दालीं'', ''कांटा'', ''किलो'', ''अर्दा किलो'', ''पाव किलो'', ग्राम इत्यादी. आनी त्याच बरोबर ‘एकाच तागडेंत जोखप'', ‘तागडेंचें दालें एकेवटेन जड जावप'' अशे वाक्प्रचार दिले.

पूण त्याच बरोबर ह्या तराजूने आमचे आधींचे शब्द खाऊन टाकले. ‘गिन्नाटी'', ‘पड'', ‘पायली'', ‘कुडव'', ‘मण'', ‘खांडी'', ‘कुंभ'', ‘पाव शेर'', ‘अर्धशेर'', ‘शेर'', मापटें'' हे शब्द आमच्या भाषेतून कधी लुप्त पावले हे कळलेसुध्दा नाही. त्याच बरोबर ह्या समवेत आलेले वाक्प्रचार आणि म्हणी सुध्दा गडप झाल्या. उदाहरणार्थ ‘शेराक सवायशेर'', ‘पायली भर पसारो'', ‘खांडीभर लोक'',‘ पायलेक पंचविस'', ‘खांडयेक एकविस कुडव पोल’, इत्यादी. ह्याचा अर्थ आतां कसा कळणार?

आधुनिकीकरणामुळे आमच्या कृषी संस्कृतीत आमुलाग्र बदल झाला. नायलोनचे दोर आले व शेतकऱ्याना आवश्यक असणारे दोर शेतकरी जे तयार करायचा ते बंद झाले. त्या दोरा ना गरजेनुसार वेगवेगळ्या गाठी मारल्या जायच्या. ‘निसरगांठ’,’ ‘बोरगांठ’, ‘चारीगांठ’ ह्या गाठीचे प्रकार शब्दासहित हद्दपार झाल्या.

‘सुंभ जळलें तरी पिळ वचना’,‘दुसऱ्याचे जांगेर दोरयेक पिळ दिंवचो’ ह्या म्हणी विस्मरणात गेल्या. नांगर गेला आणि ट्रेक्टर आला. आणि नांगरा संबंधित कित्येक शब्द लुप्त झाले..

‘एकाच जोताक बांदप’, ‘फ़ुडलें जोत तशें फ़ाटलें जोत’ अशा म्हणि कालबाह्य झाल्या. एका कुळगरा संबंधित शेंकडो शब्द कोकणी भाषेत आहेत आनी ते शब्द हळू हळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com