Manish Jadhav
वेल्लोर किल्ला हा भारतातील सर्वात मजबूत आणि सुरक्षित किल्ल्यांपैकी एक मानला जातो. या किल्ल्याची निर्मिती 16व्या शतकात (अंदाजे 1566 मध्ये) विजयनगर साम्राज्याचे राजे सदाशिव राय यांच्या कार्यकाळात चिन्ना बोम्मी रेड्डी आणि थिम्मा रेड्डी नायक यांनी केली होती.
या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या सभोवताली असलेला विशाल खंदक. हा खंदक इतका खोल आणि रुंद आहे की शत्रूला किल्ल्यात प्रवेश करणे अशक्य होते. ऐतिहासिक नोंदींनुसार, पूर्वी या खंदकात 10000 हून अधिक मगरी पाळल्या गेल्या होत्या, जेणेकरुन शत्रूने पोहून येण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा तिथेच अंत व्हावा.
किल्ल्याच्या आत विजयनगर स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण असलेले प्रसिद्ध 'श्री जलकंडेश्वर मंदिर' आहे. या मंदिरातील दगडी कोरीव काम, विशाल गोपुरम आणि कलाकुसर भाविक व पर्यटकांना थक्क करुन सोडते. याशिवाय किल्ल्याच्या आवारात एक ऐतिहासिक मशीद आणि चर्च देखील आहे, जे धार्मिक सलोख्याचे प्रतीक मानले जाते.
श्रीरंगपट्टणमच्या युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाल्यानंतर इंग्रजांनी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला (मुले आणि पत्नी) याच वेल्लोर किल्ल्यात नजरकैदेत ठेवले होते. एवढेच नव्हे तर, श्रीलंकेचे शेवटचे राजे 'विक्रम राजसिंहा' यांनाही इंग्रजांनी याच किल्ल्यात कैदी म्हणून ठेवले होते.
1857 च्या स्वातंत्र्यलढ्यापूर्वी 51 वर्षे आधी, म्हणजेच 10 जुलै 1806 रोजी याच किल्ल्यात इंग्रजांविरुद्ध भारताचा पहिला मोठा सिपाही उठाव झाला होता, ज्याला 'वेल्लोर बंड' म्हटले जाते. भारतीय सैनिकांनी किल्ल्यावर ताबा मिळवून टिपू सुलतानचा मुलगा फत्तेह हैदर याला राजा घोषित केले होते, मात्र इंग्रजांनी हे बंड अमानुषपणे मोडून काढले.
हा किल्ला पूर्णपणे मजबूत ग्रॅनाइट दगडांनी बांधला गेला. याची दुहेरी तटबंदी इतकी अवाढव्य आहे की, त्यावर एकाच वेळी दोन ते तीन तोफा तैनात केल्या जाऊ शकत होत्या. ब्रिटिशांच्या मते, हा किल्ला तत्कालीन भारतातील सर्वात अभेद्य लष्करी ठाणे होता.
आज हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या (ASI) देखरेखीखाली असून एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. किल्ल्याच्या आत एक ऐतिहासिक संग्रहालय आहे, जिथे जुनी शस्त्रे, तोफा आणि विजापूर व विजयनगर काळातील दुर्मिळ वस्तू पाहायला मिळतात.