Manish Jadhav
पुण्यातील मावळ तालुक्यातील पवना धरणाजवळ असलेला तुंग किल्ला आपल्या अणकुचीदार आकारामुळे लांबूनच ओळखला जातो. याला 'कठिणगड' असेही म्हणतात, कारण याची चढण अत्यंत तीव्र आणि आव्हानात्मक आहे.
या किल्ल्याचा मुख्य उद्देश हा महत्त्वाच्या अशा लोहगड आणि विसापूर किल्ल्यांकडे जाणाऱ्या मार्गावर देखरेख ठेवणे हा होता. स्वराज्याच्या संरक्षणासाठी हा एक महत्त्वाचा 'वॉच टॉवर' मानला जात असे.
प्रारंभी हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ प्रांतात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवताना या किल्ल्याचे धोरणात्मक महत्त्व ओळखून तो स्वराज्यात सामील करुन घेतला.
तुंग किल्ल्याचा घेरा लहान असल्याने येथे मोठ्या फौजेची गरज नव्हती. अवघ्या 200 ते 300 मावळ्यांच्या मदतीने हा किल्ला दीर्घकाळ लढवता येणे शक्य होते, अशी याची भौगोलिक रचना आहे.
स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात कान्होजी जेधे आणि बाजी पासलकर यांसारख्या विश्वासू सरदारांनी मावळ पट्ट्यातील या किल्ल्यांच्या बळकटीकरणासाठी मोठे योगदान दिले.
1665 च्या 'पुरंदरच्या तहा'मध्ये शिवाजी महाराजांनी जे किल्ले मुघलांना दिले होते, त्यात तुंग किल्ल्याचाही समावेश होता. मात्र, पुढे महाराजांनी आपल्या गनिमी काव्याने हा किल्ला पुन्हा स्वराज्यात परत मिळवला.
गडावर तुंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. तसेच गडावर असलेल्या पाण्याचे टाके आणि तटबंदी आजही महाराजांच्या काळातील दुर्गस्थापत्य कलेची साक्ष देतात.
मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर 1818 मध्ये जनरल प्रॉथर याने हा किल्ला जिंकला. मात्र, आजही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे हा गड दुर्गप्रेमींना आणि इतिहास संशोधकांना शिवशाहीच्या स्मृतींची आठवण करुन देतो.