Manish Jadhav
या किल्ल्याची मूळ स्थापना 17व्या शतकात सावंतवाडीचे राजे खेम सावंत भोसले यांनी केली होती. तेरेखोल नदीच्या मुखावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अरबी समुद्रातून होणाऱ्या परकीय आक्रमणांना रोखण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता.
मे 1746 मध्ये पोर्तुगीज व्हाईसरॉय डोम पेड्रो मिगुएल डी अल्मेडा याने या किल्ल्यावर मोठा हल्ला केला. पोर्तुगीज नौदलाच्या शक्तिशाली तोफांसमोर सावंतवाडीच्या सैन्याचा टिकाव लागला नाही आणि 23 मे 1746 रोजी हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला.
ताबा मिळवल्यानंतर पोर्तुगीजांनी या किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली. त्यांनी किल्ल्याच्या भिंती अधिक मजबूत केल्या आणि तिथे 21 तोफा तैनात केल्या. येथून ते संपूर्ण किनारपट्टीवर आणि व्यापारी जहाजांवर पाळत ठेवत असत.
किल्ला जिंकल्यानंतर पोर्तुगीजांनी 1765 मध्ये किल्ल्याच्या आत 'सेंट अँथनी' यांना समर्पित एक सुंदर चर्च बांधले. हे चर्च आजही किल्ल्याच्या आवारात सुस्थितीत उभे असून ते पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे.
भैंसोरगडप्रमाणेच या किल्ल्यानेही अनेक मोठे संघर्ष पाहिले. पोर्तुगीजांच्या ताब्यातील हा किल्ला परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी अनेकदा प्रयत्न केले, परंतु पोर्तुगीजांच्या आधुनिक लष्करी यंत्रणेमुळे हा किल्ला बराच काळ त्यांच्याकडेच राहिला.
15 ऑगस्ट 1954 रोजी अल्फ्रेड अलोनिसस या भारतीय स्वातंत्र्यसैनिकाने आपल्या सहकाऱ्यांसह या किल्ल्यावर प्रवेश केला आणि तिथला पोर्तुगीज ध्वज उतरवून भारतीय तिरंगा फडकावला. ही घटना गोवा मुक्ती संग्रामातील अत्यंत थरारक आणि ऐतिहासिक मानली जाते.
1961 मध्ये गोवा पूर्णपणे मुक्त झाल्यानंतर हा किल्ला भारताचा भाग बनला. शतकांचा रक्तरंजित आणि संघर्षाचा इतिहास अंगावर बाळगणारा हा किल्ला आज एक सुंदर 'हेरिटेज हॉटेल' म्हणून ओळखला जातो, जिथून तेरेखोल नदी आणि समुद्राचा विहंगम नजराणा दिसतो.