Manish Jadhav
शिवराज्याभिषेक करण्यापूर्वी महाराज राजधानीसाठी विविध किल्ल्यांचा विचार करत होते. रायगडासोबतच सुधागड हे नावही राजधानीसाठी प्रबळ दावेदार होते, कारण या किल्ल्याचा विस्तार आणि संरक्षण व्यवस्था अत्यंत भक्कम होती.
महाराजांनी या किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्याचे मूळ नाव 'भोरप्या डोंगर' बदलून 'सुधागड' असे केले. महाराजांनी स्वराज्यातील अनेक किल्ल्यांचे नामकरण करुन त्यांना नवी ओळख दिली होती.
सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाली गावात महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्त्वाच्या व्यक्तींची वास्तव्ये होती. स्वराज्याच्या राज्यकारभाराचे हे एक महत्त्वाचे केंद्र होते.
सुधागड हा महाराष्ट्रातील अशा काही किल्ल्यांपैकी एक आहे, ज्याचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे. महाराजांना येथे मोठी फौज आणि रसद साठवणे सोपे जात असे, जे युद्धाच्या काळात फायद्याचे ठरले.
रायगड आणि कोकण किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी सुधागड हे महाराजांसाठी एक मोक्याचे ठिकाण होते. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा सुटा असल्याने शत्रूवर नजर ठेवणे येथून सोपे होते.
सुधागडचा महादरवाजा हा हुबेहूब रायगडाच्या महादरवाजासारखा दिसतो. ही स्थापत्यशैली महाराजांच्या काळातील दुर्गबांधणीचे उत्तम उदाहरण आहे, जे शत्रूला चकवण्यासाठी आणि संरक्षणासाठी डिझाइन केले होते.
महाराजांच्या काळात आणि पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही सुधागडला महत्त्व लाभले. औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर आणि संभाजी महाराज यांची ऐतिहासिक भेट याच गडाच्या पायथ्याशी झाल्याचे मानले जाते.
महाराजांनी या किल्ल्यावर भोरप्या देवीचे मंदिर आणि अनेक पाण्याचे टाके बांधले. आजही सुधागड हा दुर्गप्रेमींसाठी महाराजांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवणारा एक "जिवंत किल्ले" म्हणून ओळखला जातो.