Sameer Amunekar
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि अभेद्य जलदुर्ग आहे. मालवणच्या किनाऱ्यापासून साधारण ३ किमी अंतरावर, अरबी समुद्रातील 'कुरटे' नावाच्या खडकाळ बेटावर हा ऐतिहासिक किल्ला दिमाखात उभा आहे.
किल्ल्याचा पाया मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राच्या पाण्यात पायाभरणी करताना तब्बल ७० हजार किलो (३५० मण) शिशाचा वापर केला होता. यामुळेच अनेक शतकांनंतरही लाटांचा मारा सोसत हा किल्ला भक्कम उभा आहे.
विदेशी आणि जंजिऱ्याच्या सिद्दीच्या आक्रमणांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी महाराजांनी १६६४ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरू केले. सिंधुदुर्ग हा मराठा साम्राज्याच्या आरमाराचा मुख्य आधारस्तंभ होता.
या भव्य किल्ल्याला ४८ मजबूत बुरुज आहेत. किल्ल्याची तटबंदी तब्बल ३ किलोमीटर लांब आणि प्रचंड रुंद आहे. समुद्राच्या महाकाय लाटांचा तटबंदीवर थेट परिणाम होऊ नये म्हणून ती नागमोडी आकारात बांधण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायांचे ठसे एका देवळीत सुरक्षित पाहायला मिळतात. शिवप्रेमींसाठी हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते.
या किल्ल्याच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर आहे, जे त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी १६९५ मध्ये बांधले होते. या मंदिरात शिवरायांची 'नाविक' वेषातील अतिशय देखणी मूर्ती आहे.
इतिहासासोबतच हा किल्ला आता पर्यटनाचे मोठे केंद्र बनला आहे. किल्ल्याच्या बाजूला असलेल्या स्वच्छ पाण्यात पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग (Scuba Diving) आणि स्नॉर्कलिंगद्वारे समुद्रातील मनमोहक सृष्टी पाहता येते.