Manish Jadhav
प्रभू रामचंद्र वनवासात असताना काही काळ या किल्ल्याच्या परिसरात वास्तव्यास होते. जिथे प्रभू राम विश्रांती घेत असत (राम-शेज म्हणजे रामाची गादी/बेड), त्यावरुन या किल्ल्याला 'रामशेज' हे नाव पडले, अशी मान्यता आहे.
मराठ्यांच्या इतिहासात रामशेज किल्ल्याचा लढा सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, मुघल सम्राट औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यासाठी मोठी फौज पाठवली. पण मराठ्यांनी सलग 6 वर्षे हा किल्ला लढवला आणि मुघलांना नमवले.
जेव्हा मुघल सेनापती शहाबुद्दीन खान (गाजीउद्दीन फिरोज जंग) याने मोठ्या सैन्यासह किल्ल्याला वेढा घातला, तेव्हा रामशेजचे किल्लेदार सूर्याजी जेधे यांनी केवळ काहीशे मावळ्यांच्या मदतीने मुघलांचे सर्व हल्ले अपयशी ठरवले.
औरंगजेबाला वाटले होते की, हा छोटासा किल्ला अवघ्या काही तासांत किंवा दिवसांत जिंकता येईल. मात्र, रामशेजने औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेला तब्बल 6 वर्षे दारात उभे ठेवले, ज्यामुळे मुघल सम्राटाचा अहंकार पूर्णपणे चक्काचूर झाला.
किल्ल्यावर दारुगोळा आणि तोफांची कमतरता असताना, मावळ्यांनी झाडांच्या विळख्यातून लाकडी तोफा तयार केल्या होत्या. त्यातून दगड आणि गोळे मारुन मुघल सैन्याला पळवून लावले गेले. मराठ्यांच्या या अद्भूत युद्धकौशल्याने मुघल चक्रावून गेले होते.
6 वर्षे प्रयत्न करुनही जेव्हा मुघलांना किल्ला जिंकता आला नाही, तेव्हा त्यांनी किल्ला सर करण्यासाठी एका मांत्रिकाची मदत घेतली होती. त्या मांत्रिकाने एक सोन्याचा रथ बनवून किल्ल्यावर जादू करण्याचा प्रयत्न केला, पण मावळ्यांनी तो रथ आणि मांत्रिक दोघांनाही उद्ध्वस्त केले.
रामशेज किल्ला हा नैसर्गिकरीत्याच एका उंच कड्यावर वसलेला आहे. किल्ल्यात गुप्त भुयारी मार्ग, पाण्याच्या टाक्या आणि संरक्षणासाठी उत्तम तटबंदी आहे. शत्रूला सहजासहजी वर चढता येऊ नये, अशी याची कठीण भौगोलिक रचना आहे.