Manish Jadhav
रामशेज म्हणजे 'प्रभू श्रीरामांची शेज' (बिछाना). वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते, अशी श्रद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्याचे सक्षमीकरण केले होते.
नाशिक परिसरावर आणि मोगलांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपतींनी रामशेज किल्ल्याची पुनर्रचना केली. स्वराज्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला एक महत्त्वाचा दुर्ग होता.
महाराजांच्या निधनानंतर, जेव्हा औरंगजेब पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्र जिंकण्यासाठी आला, तेव्हा रामशेजने त्याला पहिले मोठे आव्हान दिले. अवघ्या 600 मावळ्यांनी मोगलांच्या 60-70 हजारांच्या फौजेला सलग साडेपाच वर्षे झुंजवले.
रामशेजचा लढा हा इतिहासातील सर्वात मोठा 'डिफेन्स' मानला जातो. शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या शिस्तीमुळेच संभाजी महाराजांच्या काळात मावळ्यांनी हार न मानता मोगल सेनापती शहाबुद्दीन खान आणि कासिम खान यांना रिकाम्या हाती परत धाडले.
किल्ल्यावर तोफांची कमतरता असताना मावळ्यांनी महाराजांच्या शिकवणीचा वापर करुन चामड्याने मढवलेल्या लाकडी तोफा तयार केल्या. या तोफांच्या माऱ्याने मोगलांना वाटले की, मराठ्यांकडे प्रचंड दारुगोळा आहे.
ज्या किल्ल्याला औरंगजेबाने 'एक दिवसात जिंकेन' असे म्हटले होते, त्या किल्ल्याने त्याला कित्येक वर्षे नाकीनऊ आणले. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य किती भक्कम होतं, याचं हे जिवंत उदाहरण आहे.
महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर करुन रात्रीच्या वेळी किल्ल्यावरून खाली उतरून मोगल छावण्यांवर छापे टाकले जायचे. कमी सैन्यातही बलाढ्य शत्रूला कसं थकवायचं, हे रामशेजने जगाला दाखवून दिले.
आजही रामशेजकडे पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेमध्ये निर्माण केलेल्या स्वाभिमानाची जाणीव होते. हा किल्ला केवळ दगड-मातीचा नसून, मराठ्यांच्या अभेद्य इच्छाशक्तीचे आणि शिवरायांच्या विचारांचे जिवंत स्मारक आहे.