Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे नाते हे केवळ माय-लेकाचे नाते नव्हते, तर ते स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेचे एक महान पर्व होते.
शिवरायांच्या बालपणी शहाजीराजे बंगळुरुला असताना, जिजाऊंनी शिवबांच्या शिक्षणाची आणि संस्कारांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. जिजाऊ या शिवरायांच्या पहिल्या गुरु होत्या.
परकीय आक्रमकांशी लढण्यासाठी धैर्य मिळावे, म्हणून जिजाऊ शिवरायांना बालपणी रामायण, महाभारत आणि थोर पुरुषांच्या कथा सांगत असत. यातूनच शिवरायांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण झाली.
"दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचे राज्य निर्माण कर," ही शिकवण जिजाऊंनीच शिवरायांना दिली. स्वराज्याचे स्वप्न जिजाऊंनी पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याचे बळ शिवरायांना दिले.
अफजलखानाचे संकट असो वा आग्र्याहून सुटका, प्रत्येक कठीण प्रसंगात जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवराय मोहिमेवर असताना स्वराज्याची धुरा जिजाऊ अत्यंत समर्थपणे सांभाळत असत.
शिवरायांसाठी जिजाऊ केवळ माता नव्हत्या, तर त्या एक सर्वोच्च मार्गदर्शक आणि सल्लागार होत्या. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी महाराज जिजाऊंचा सल्ला आवर्जून घेत असत.
"परस्त्री मातेसमान" हा संस्कार शिवरायांना जिजाऊंकडूनच मिळाला. स्वराज्यात स्त्रियांचा सन्मान राखला गेला, याचे मुख्य श्रेय जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांना जाते.
शिवरायांचा राज्याभिषेक व्हावा आणि हिंदू स्वराज्य स्थापन व्हावे, हे जिजाऊंचे सर्वात मोठे स्वप्न होते. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक पाहिल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी तृप्त मनाने देह ठेवला.