Manish Jadhav
14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा जन्म झाला. या ऐतिहासिक घटनेमुळे या किल्ल्याला शिवप्रेमींच्या हृदयात अढळ स्थान आहे.
1665 मध्ये मुघल सरदार दिलेरखानाने किल्ल्याला वेढा घातला होता. तेव्हा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या 700 मावळ्यांसह बलाढ्य मुघल फौजेला रोखले आणि लढता लढता वीरमरण पत्करले.
स्वराज्यावर आलेले संकट टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झाराजे जयसिंगसोबत ऐतिहासिक 'पुरंदरचा तह' करावा लागला. या तहाअन्वये महाराजांना स्वराज्याचे 23 किल्ले आणि 4 लाख होन मुघलांना द्यावे लागले होते.
पुरंदर हा एकटा किल्ला नसून पुरंदर आणि वज्रगड हे दोन जुळे किल्ले आहेत. वज्रगड हा पुरंदरचा संरक्षणकर्ता मानला जातो; कारण वज्रगड जिंकल्याशिवाय पुरंदर जिंकणे अशक्य होते.
पुरंदरच्या सर्वात उंच शिखरावर (बालेकिल्ल्यावर) भगवान केदारेश्वराचे (महादेव) पुरातन मंदिर आहे. येथून परिसराचे विहंगम दृश्य दिसते आणि या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 4472 फूट आहे.
मराठा साम्राज्याच्या काळात विशेषतः पेशवे काळात पुरंदर किल्ल्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले. अनेक ऐतिहासिक खलबते आणि महत्त्वपूर्ण करार याच किल्ल्यावर झाले.
किल्ल्याचा 'दिल्ली दरवाजा' स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. किल्ल्याची तटबंदी, खंदकडा आणि नैसर्गिक कड्यांची रचना याला शत्रूसाठी अभेद्य बनवते.