Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी (1648 मध्ये) पुरंदर किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. स्वराज्याच्या विस्तारासाठी हा किल्ला काबीज करणे ही महाराजांची एक मोठी कूटनीती होती.
राजगड राजधानी होण्यापूर्वी, पुरंदर किल्ल्याने स्वराज्याच्या प्रशासकीय कामात महत्त्वाची भूमिका बजावली होती. महाराजांच्या अनेक धोरणात्मक निर्णयांचा हा किल्ला साक्षीदार आहे.
महाराजांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण याच किल्ल्यावर आला. 16 मे 1657 रोजी पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर युवराज संभाजी महाराजांचा जन्म झाला, ज्यामुळे हा किल्ला 'शिवपुत्राचे जन्मस्थान' म्हणून अजरामर झाला.
मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने जेव्हा पुरंदरला वेढा घातला, तेव्हा महाराजांच्या रणनीतीची मोठी कसोटी लागली. या युद्धात मुरारबाजी देशपांडे यांनी दाखवलेला पराक्रम पाहून खुद्द शत्रूही थक्क झाला होता.
स्वराज्यातील रयतेची होणारी कत्तल थांबवण्यासाठी शिवरायांनी याच किल्ल्याच्या पायथ्याशी मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी ऐतिहासिक 'पुरंदरचा तह' केला. यात महाराजांना नाईलाजाने 23 किल्ले मुघलांना द्यावे लावले होते.
आग्र्याच्या कैदेतून सुटल्यानंतर महाराजांनी गमावलेले किल्ले पुन्हा जिंकण्याची मोहीम आखली. 1670 मध्ये निळोपंत मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा एकदा पुरंदरवर भगवा फडकवून मुघलांना धूळ चारली.
किल्ल्यावरील प्राचीन पुरंदरेश्वर महादेव मंदिर हे महाराजांच्या श्रद्धेचे स्थान होते. मोहिमेवर जाण्यापूर्वी किंवा महत्त्वाच्या निर्णयावेळी महाराज या मंदिरात दर्शन घेत असत, असे इतिहासात संदर्भ आढळतात.
महाराजांनी पुरंदरची तटबंदी आणि बुरुज अधिक मजबूत केले होते. 'ज्याकडे पुरंदर, त्याचे निम्मे राज्य' असे त्याकाळी म्हटले जाई, इतके लष्करी महत्त्व महाराजांनी या किल्ल्याला दिले होते.