Manish Jadhav
नेताजी पालकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातील अत्यंत विश्वासू सहकारी होते. मानकोजी दहातोंडे यांच्यानंतर महाराजांनी नेताजींची स्वराज्याचे 'सरसेनापती' म्हणून नियुक्ती केली होती.
नेताजी पालकर हे युद्धकलेत इतके निपुण होते की शत्रू त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणून ओळखत असे. गनिमी काव्याने मुघल आणि आदिलशाही फौजांना त्यांनी अनेकदा सळो की पळो करुन सोडले होते.
प्रतापगडावर अफझलखानाचा वध झाल्यानंतर पळणाऱ्या विजापुरी सैन्याचा पाठलाग करुन नेताजींनी विजापूरपर्यंत धडक मारली होती. त्यांच्या या वेगवान हालचालींमुळे शत्रूमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती.
पुरंदरच्या तहानंतर, मिर्झाराजे जयसिंगाच्या सांगण्यावरुन नेताजी मुघलांच्या मोहिमेत सामील झाले. मात्र, औरंगजेबाने दगाफटका करुन त्यांना अटक केली आणि दिल्लीला पाठवून दिले.
दिल्लीत नेताजींना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले आणि त्यांचे नाव 'मुहम्मद कुली खान' असे ठेवण्यात आले. तब्बल 10 वर्षे त्यांनी मुघलांच्या सेवेमध्ये आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर लढाया केल्या.
इतक्या वर्षांनंतरही नेताजींच्या मनात स्वराज्याबद्दलची ओढ कमी झाली नव्हती. संधी मिळताच ते दक्षिणेत आले आणि पुन्हा शिवरायांच्या चरणी रुजू झाले. महाराजांनी मोठ्या मनाने आपल्या या जुन्या मावळ्याचे स्वागत केले.
शिवाजी महाराजांनी त्या काळात एक क्रांतिकारी पाऊल उचलले. त्यांनी नेताजी पालकर यांचे शुद्धीकरण करुन त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. ही घटना त्या काळातील सामाजिक चौकटी मोडीत काढणारी आणि महाराजांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवणारी ठरली.