Manish Jadhav
केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील इतर गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत मरारी हा अत्यंत शांत आणि निसर्गरम्य किनारा आहे. येथील पांढरी शुभ्र वाळू आणि नारळाच्या झाडांची दाट सावली पर्यटकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाते.
हा समुद्रकिनारा 'मरारीकुलम' या छोट्याशा मासेमारी गावाजवळ वसलेला आहे. त्यामुळेच याला 'मरारी' असे नाव पडले असून येथे आजही पारंपरिक मल्याळी संस्कृतीचे दर्शन घडते.
मरारी हे आजही एक सक्रिय मासेमारी केंद्र आहे. पहाटेच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक मच्छीमार त्यांच्या पारंपरिक बोटींनी मासेमारी करताना पाहणे हा एक अद्भूत अनुभव असतो.
या किनाऱ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविविधता पाहायला मिळते. येथे अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी, फुलपाखरे आणि विविध प्रकारची फुले आढळतात, ज्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण ठरते.
मरारी समुद्रकिनाऱ्याच्या आसपास अनेक जागतिक दर्जाचे आयुर्वेदिक केंद्र आणि इको-फ्रेंडली रिसॉर्ट्स आहेत. येथे पर्यटक 'आयुर्वेदिक स्पा' आणि योगाभ्यासाचा आनंद घेण्यासाठी जगभरातून येतात.
या किनाऱ्याला केरळमधील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानले जाते. येथील इको-टूरिझम उपक्रमांमुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यावर मोठा भर दिला जातो.
मरारीपासून हाकेच्या अंतरावर अलाप्पुझाचे प्रसिद्ध 'बॅकवॉटर्स' आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाच वेळी अथांग समुद्र आणि संथ बॅकवॉटर्समधील हाऊसबाेट सफरीचा आनंद घेता येतो.