Sameer Amunekar
कोकणातील मालवण येथे असलेल्या सिंधुदुर्ग किल्लावर आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उजव्या हाताचा ठसा आणि डाव्या पायाचा ठसा पाहायला मिळतो.
हे दोन्ही ठसे दगडात असून किल्ल्यावरील छोट्या देवळ्यांमध्ये सुरक्षित अवस्थेत आहेत.
महाद्वारापासून उजव्या बाजूच्या तटबंदीवर या देवळ्या असून तेथे हे ऐतिहासिक ठसे जतन करण्यात आले आहेत.
स्थानिक कथेनुसार, किल्ल्याचं बांधकाम सुरू असताना महाराजांनी ओल्या दगडावर हात-पाय ठेवले आणि गवंड्याने ते ठसे तस्सेच कोरून ठेवले.
हे ठसे शिवरायांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आणि किल्ल्याच्या बांधकामातील त्यांच्या सहभागाची सजीव साक्ष मानले जातात.
किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिर हे शिवरायांना समर्पित महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून ते राजाराम महाराजांच्या काळात १६९५ साली बांधले गेले.
सिंधुदुर्ग हा एक भक्कम जलदुर्ग असून, हे हाता-पायाचे निशाण आजही इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी श्रद्धा व अभिमानाचं केंद्र ठरले आहे.