Manish Jadhav
या किल्ल्याला 'लोहागढ' म्हणजेच 'लोखंडी किल्ला' म्हटले जाते. या किल्ल्याची रचना अशी होती की, कोणतीही शक्ती किंवा तोफेचे गोळे हा किल्ला भेदून आत जाऊ शकत नव्हते. त्याच्या अभेद्यतेमुळेच त्याला हे नाव मिळाले.
या ऐतिहासिक किल्ल्याची निर्मिती 1733 मध्ये जाट शासक महाराजा सूरजमल यांनी केली होती. त्यांनी या किल्ल्याची रचना अत्यंत हुशारीने आणि तत्कालीन युद्धपद्धतीचा विचार करुन केली होती, ज्यामुळे शत्रूला इथे पोहोचणे अशक्य झाले.
किल्ल्याच्या मुख्य दगडाच्या भिंतीबाहेर मातीची एक प्रचंड जाड भिंत बांधण्यात आली होती. शत्रूने तोफेचे गोळे डागले की, ते या मातीच्या भिंतीत खोलवर रुतून बसत आणि त्यांचा स्फोट होत नसे. त्यामुळे शत्रूची शस्त्रेच त्यांच्याविरुद्ध निकामी ठरत.
किल्ल्याभोवती 60 फूट खोल आणि 150 फूट रुंद अशी विस्तीर्ण दरी (खंदक) खणण्यात आली होती. यात 'मोती झील'मधून पाणी सोडले जायचे. या पाण्यात मगरी सोडल्या जात असल्याने शत्रूच्या सैन्याला हा खंदक पार करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते.
लोहागढ किल्ल्याचा मुख्य दरवाजा 'अष्टधातू' बनलेला आहे. हा दरवाजा मूळचा चित्तोडगढ किल्ल्याचा होता, जो अल्लाउद्दीन खिलजीने दिल्लीला नेला होता. नंतर महाराजा जवाहर सिंह यांनी दिल्लीवर स्वारी करुन हा दरवाजा अभिमानाने परत आणला आणि लोहागढवर बसवला.
1805 मध्ये ब्रिटिश जनरल लॉर्ड लेक याने आपल्या अथांग सैन्यासह लोहागढ जिंकण्यासाठी तब्बल 4 महिने प्रयत्न केले आणि 5 वेळा हल्ला केला. मात्र, प्रत्येक वेळी इंग्रजांना दारुण पराभव स्वीकारावा लागला आणि ब्रिटिश सैन्याला माघार घ्यावी लागली.
मुघल असोत की इंग्रज, इतिहासकाळात कोणत्याही परकीय शक्तीला लोहागढ किल्ला कधीही जिंकता आला नाही. म्हणूनच भारतीय दुर्गम इतिहासात या किल्ल्याला 'एकमेव अजय किल्ला' म्हणून गौरवले जाते.