Manish Jadhav
लोहगड किल्ला ट्रेकिंगसाठी अतिशय सोपा आणि सुरक्षित मानला जातो. मुंबई आणि पुण्याच्या मध्यभागी लोणावळ्याजवळ असल्यामुळे, ज्यांना ट्रेकिंगचा फारसा अनुभव नाही अशा नवशिक्यांसाठी पावसाळ्यात भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम किल्ला आहे.
लोहगड किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचा 'विंचू कडा'. पावसाळ्यात या कड्यावरुन आजूबाजूला पसरलेली धुक्याची चादर आणि खोल दऱ्यांचे दृश्य अत्यंत थरारक आणि विहंगम दिसते. मात्र, पावसाळ्यात येथे वारा खूप तीव्र असतो, त्यामुळे सावधगिरी बाळगावी.
किल्ल्यावर वर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची उत्तम सोय आहे. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महाद्वार अशा चार भव्य दरवाजांमधून जाताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गौरवशाली इतिहासाची प्रचिती येते.
लोहगड ट्रेकसोबतच पर्यटकांना पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक 'भाजे गुहा' आणि जवळच असलेल्या 'कार्ला गुहांना' भेट देता येते. पावसाळ्यात या गुहांच्या परिसरातील डोंगर हिरवेगार होतात आणि अनेक छोटे धबधबे पाहायला मिळतात.
पावसाळ्यात सतत होणाऱ्या पावसामुळे किल्ल्याच्या जुन्या दगडी पायऱ्यांवर शेवाळ जमा होते आणि त्या अत्यंत निसरड्या होतात. त्यामुळे ट्रेक करताना चांगल्या ग्रीपचे शूज वापरणे आणि सावकाश पावले टाकणे अत्यंत गरजेचे आहे.
पावसाळ्यात लोहगड किल्ला अनेकदा पूर्णपणे धुक्यात हरवून जातो. किल्ल्याच्या सर्वोच्च टोकदार भागावर उभे राहून धुक्याला स्पर्श करण्याचा आणि ढगांमधून चालण्याचा अनुभव ट्रेकर्सना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो.
लोणावळा किंवा मळवली रेल्वे स्टेशनवरुन खाजगी गाड्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी सहज पोहोचता येते. ट्रेक पूर्ण केल्यानंतर पायथ्याशी मिळणारी गरमागरम पिठलं-भाकरी, कांदा भजी आणि चुलीवरचा चहा पावसाळ्याचा आनंद द्विगुणीत करतो.