Manish Jadhav
कुंभलगढ हा किल्ला अरवली पर्वत रांगांच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर एका उंच टेकडीवर बांधला गेला. या दुर्गम उंचीमुळे शत्रूच्या सैन्याला खाली उभे राहून किल्ल्याचा अंदाज घेणे अत्यंत कठीण जात असे.
कुंभलगढच्या आत सर्वात उंचावर एक स्वतंत्र किल्ला आहे, ज्याला 'कटारगढ' म्हटले जाते. हा मेवाड राजघराण्याचा खास निवासभाग होता. कटारगढ इतका सरळ आणि उंचावर आहे की, "खाली उभे राहून वर पाहिले तर डोक्यावरील पगडी खाली पडेल," असे वर्णन अबुल फजलने केले.
इतिहासकाळात रात्रीच्या वेळी संपूर्ण दरी आणि किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी महाराणा कुंभा 50 किलो तूप आणि कापड वापरुन विशाल मशाली पेटवत असत. या मशालींच्या प्रकाशात खाली काम करणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीही शेतात स्पष्ट दिसत असे.
जेव्हा चित्तोडगढ किल्ल्यात दगाफटका झाला, तेव्हा दासी पन्ना दाईने स्वतःच्या मुलाचे बलिदान देऊन मेवाडचे वारसदार कुँवर उदयसिंह (महाराणा प्रताप यांचे वडील) यांचे प्राण वाचवले होते. पन्ना दाईने उदयसिंहांना सुरक्षितपणे याच कुंभलगढ किल्ल्यात आणून आश्रय दिला होता.
महाराणा कुंभा हे केवळ कुशल युध्दे आणि वास्तुविशारद नव्हते, तर ते संगीत आणि साहित्याचे मोठे जाणकार होते. त्यांनी याच किल्ल्यात बसून अनेक ग्रंथ आणि संगीत क्षेत्रातील महत्त्वाचे प्रबंध लिहिले. कुंभलगढ हा त्यांच्या कला आणि संस्कृतीच्या प्रेमाचा साक्षीदार आहे.
असे मानले जाते की, किल्ल्याचे बांधकाम सुरुवातीला वारंवार कोसळत होते. त्यानंतर एका साधूच्या सल्ल्यानुसार, किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि अभेद्यतेसाठी तिथे एका स्वेच्छेने पुढे आलेल्या व्यक्तीचा 'नरबळी' देण्यात आला. जिथे त्या साधूचे शीर पडले, तिथे किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजेच 'हनुमान पोल' बांधण्यात आला.
हा किल्ला मेवाड आणि मारवाड या दोन मोठ्या राज्यांच्या सीमारेषेवर बांधण्यात आला होता. मारवाडच्या सैन्याकडून होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आणि सीमेवर कडक पाळत ठेवण्यासाठी कुंभलगढ हा मेवाडचा सर्वात मोठा लष्करी तळ होता.