Manish Jadhav
इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत केएल राहुल सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. शुभमन गिलनंतर तोच भारताकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला उद्यापासून (31 जुलै) सुरुवात होत आहे. या सामन्यातही राहुलकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.
दरम्यान, भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतके झळकावली आहेत. तर राहुलने आतापर्यंत 5 शतके केली आहेत.
जर राहुलने पाचव्या कसोटीत 2 शतके (Two Centuries) झळकावली, तर तो अझरुद्दीन यांचा विक्रम मोडेल. एका शतकाने तो अझरुद्दीन यांच्या विक्रमाची बरोबरी करेल.
तसेच, जर राहुलने 2 शतके केली, तर तो इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचेल. या यादीत राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर प्रत्येकी 7 शतकांसह अव्वल स्थानी आहेत.
दुसरीकडे, सुनील गावस्कर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत इंग्लंडच्या भूमीवर 15 सामन्यांत 1152 धावा केल्या आहेत. हा एक महत्त्वाचा विक्रम आहे.
राहुल सध्या गावस्करांच्या या विक्रमाच्या अगदी जवळ आहे. राहुलच्या नावावर आतापर्यंत इंग्लंडमध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये 1108 धावा आहेत.
गावस्कर यांना मागे टाकण्यासाठी राहुलला केवळ 45 धावांची गरज आहे. ओव्हल कसोटीत 45 धावा करताच तो गावस्करांचाही विक्रम मोडेल.