Manish Jadhav
जैसलमेर किल्ल्याची पायाभरणी 1156 मध्ये यदुवंशी राजपूत राजा रावळ जैसल यांनी केली. त्यांच्या नावावरुनच या शहराला 'जैसलमेर' आणि किल्ल्याला 'जैसलमेर किल्ला' हे नाव पडले.
हा किल्ला पिवळ्या वाळूच्या दगडांनी बांधलेला आहे. जेव्हा सूर्यकिरणे या दगडांवर पडतात, तेव्हा हा किल्ला सोन्यासारखा चमकतो. म्हणूनच याला 'सोनार किल्ला' असे म्हटले जाते.
जैसलमेर किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आजही या किल्ल्याच्या तटबंदीच्या आत शहराची सुमारे एक चतुर्थांश (25%) लोकसंख्या राहते. किल्ल्याच्या आत घरे, हॉटेल्स, दुकाने आणि मंदिरे असून लोक पिढ्यानपिढ्या येथे वस्ती करुन आहेत.
प्राचीन काळात भारत, मध्य आशिया आणि पर्शिया (इराण) दरम्यान होणाऱ्या व्यापाराचा हा किल्ला मुख्य मार्ग होता. या रेशीम मार्गावरुन जाणाऱ्या व्यापारी तांड्यांचे संरक्षण करणे आणि कर वसुली करणे यात या किल्ल्याचे मोठे योगदान होते.
या किल्ल्याने मध्ययुगीन काळात अल्लाउद्दीन खिलजी, घियासुद्दीन तुघलक आणि अमीर त्राघाय यांच्यासारख्या आक्रमकांचा सामना केला. किल्ला वाचवण्यासाठी राजपूत योद्ध्यांनी प्राणांची आहुती दिली, तर राजपूत वीरांगनांनी स्वाभिमानासाठी 'जौहर' (अग्निकुंडात आत्मसमर्पण) केले.
हा किल्ला बांधताना कुठेही सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही. दगडांमध्ये खाचा (Interlocking Stone Technique) तयार करुन ते एकमेकांत अचूक बसवण्यात आले आहेत. वाळवंटातील वादळांमध्येही हा किल्ला शतकानुशतके मजबूत उभा आहे.
त्याच्या अद्वितीय वास्तुकला, 99 बुरुज आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे 2013 मध्ये युनेस्कोने जैसलमेर किल्ल्याला 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केले आहे.