Sameer Panditrao
लष्कर, हवाई दल आणि नौदलाने ‘त्रिशूल’ सरावाने पाकिस्तानला हादरा दिल्यानंतर आता ईशान्य सीमेवर ‘पूर्वी प्रचंड प्रहार’ सरावाची तयारी सुरू केली आहे.
११ नोव्हेंबरपासून अरुणाचल प्रदेशच्या उंच पर्वतरांगांमध्ये भारतीय सशस्त्र दलांचा हा संयुक्त युद्धसराव सुरू होणार आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत तो चालणार आहे.
या सरावात नौदलाचाही समावेश आहे. समुद्रापासून दूर असलेल्या पर्वतीय युद्धात नौदलाचा सहभाग म्हणजे भारताच्या बहुक्षेत्रीय युद्धसज्जतेतील मोठा बदल मानला जातो.
हा सराव अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे होणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून फक्त ३० किलोमीटरवर असलेल्या या ठिकाणी चीनला स्पष्ट संदेश देण्याचा भारताचा हेतू आहे.
या सरावाद्वारे भारतीय सशस्त्र दलांच्या ‘थिएटर कमांड’ या महत्त्वाकांक्षी योजनेची चाचणी घेतली जाणार आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदल एकत्रितपणे कार्यरत राहतील.
चीनने तिबेटमधील लुन्झे हवाईतळावर नव्या तळांची उभारणी केली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर भारताचा हा सराव चीनच्या कुरघोडीला ठोस उत्तर आहे.
अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ‘पूर्वी प्रचंड प्रहार’ सरावातून भारताने पुन्हा एकदा आपली सीमासुरक्षा आणि रणनीतिक सज्जता जगासमोर ठामपणे मांडली आहे.