Manish Jadhav
जिंजी किल्ल्याला 'पूर्वेकडील ट्रॉय' (Troy of the East) म्हणून ओळखले जाते. या किल्ल्याने अनेक युद्धे आणि ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत. हा किल्ला तमिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील विल्लुपुरम जिल्ह्यात स्थित आहे.
जिंजी हा फक्त एक किल्ला नाही, तर तीन टेकड्यांवर बांधलेल्या तीन किल्ल्यांचा समूह आहे. कृष्णगिरी, राजगिरी आणि चंद्रायनदुर्ग हे तीनही किल्ले मजबूत तटबंदीने जोडलेले आहेत.
हा किल्ला 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि त्याचे महत्त्व वाढवले. मराठा साम्राज्यासाठी हा किल्ला एक महत्त्वाचे केंद्र बनले.
राजाराम महाराजांनी (शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र) औरंगजेबापासून वाचण्यासाठी जिंजी किल्ल्याला आपली राजधानी बनवले होते. त्यांनी अनेक वर्षे जिंजीवरुनच मराठा साम्राज्याचा कारभार चालवला.
किल्ल्याची तटबंदी अत्यंत मजबूत आहे. यात मोठे दरवाजे, अनेक बुरुज आणि गुप्त मार्ग आहेत. किल्ल्याच्या आतमध्ये अनेक महत्त्वाच्या इमारती आहेत, जसे की राजारामांचा दरबार, धान्य कोठार आणि देवळांचे अवशेष.
या किल्ल्यावरील 'कल्याण महल' हे एक सुंदर वास्तुकलेचे उदाहरण आहे. हे महल जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने खास बनवले होते. किल्ल्यावर मोठी पाण्याची टाकी आहे, जिचा वापर पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी केला जाई.
18व्या शतकात हा किल्ला फ्रेंच आणि नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यांनी किल्ल्याचे व्यापारी आणि लष्करी महत्त्व ओळखून त्याचा वापर केला. फ्रेंच आणि इंग्रजांमध्ये या किल्ल्याच्या ताब्यात घेण्यासाठी अनेक युद्धे झाली.
आज जिंजी किल्ला एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पर्यटक येथे मराठा आणि फ्रेंच-इंग्रजांच्या इतिहासाची झलक पाहण्यासाठी येतात. या किल्ल्याची देखरेख भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे केली जाते.