Manish Jadhav
असीरगड किल्ल्याला ऐतिहासिक काळात 'दख्खनचे द्वार' किंवा 'दक्षिणची किल्ली' म्हटले जायचे. उत्तर भारतातून दक्षिण भारतात प्रवेश करण्यासाठी या किल्ल्यावर ताबा असणे अत्यंत गरजेचे मानले जात होते.
या किल्ल्याची स्थापना चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला 'आसा अहिर' नावाच्या एका मेंढपाळ राजाने केली होती. त्याच्याच नावावरुन या किल्ल्याला 'असीरगड' हे नाव मिळाले. पुढे फारुकी वंशाच्या राजाने येथे सत्ता स्थापन केली.
मोगल सम्राट अकबराच्या आयुष्यातील ही शेवटची लष्करी मोहीम होती. इसवी सन 1601 मध्ये अकबराने असीरगड जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. हा किल्ला जिंकल्यानंतरच अकबराला संपूर्ण खानदेशवर नियंत्रण मिळवता आले.
असीरगड इतका अभेद्य होता की, अकबरालाही तो सहजासहजी जिंकता येत नव्हता. इतिहासकारांच्या मते, अकबराने किल्ल्याच्या रक्षकांना सोन्या-चांदीची लाच देऊन फितूर केले आणि 'सोन्याच्या किल्ल्यांनी' या अजेय किल्ल्याचे दरवाजे उघडले.
हा किल्ला एकूण तीन भागांमध्ये विभागलेला आहे, ज्यामुळे शत्रूला यावर हल्ला करणे अशक्यप्राय व्हायचे. या तीन भागांना अनुक्रमे असीरगड, कमरगढ आणि मलयगढ या नावांनी ओळखले जाते.
या किल्ल्याशी एक अत्यंत थरारक पौराणिक कथा जोडलेली आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार, महाभारतातील अमर पात्र 'अश्वत्थामा' आजही या किल्ल्यावरील शिवमंदिरात दररोज पहाटे येऊन पूजेसाठी ताजी फुले आणि चंदन अर्पण करतो.
किल्ल्यावर डोंगराच्या शिखरावर असूनही अनेक पाण्याचे तलाव आहेत. उन्हाळ्यातही या तलावांमधील पाणी कधीही आटत नाही, जे तत्कालीन उत्कृष्ट जलव्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण मानले जाते.