Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1663 मध्ये स्वराज्यावर चाल करुन आलेल्या शाहिस्तेखानावर लाल महालात केलेला हल्ला हा त्यांच्या युद्धनीती, साहस आणि बुद्धिमत्तेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
महाराजांच्या या हल्ल्याने मुघलांना मोठा धक्का बसला होता. विशेष म्हणजे, महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली होती.
1660 औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान याला अफाट सैन्यबळासह स्वराज्यावर पाठवले होते. शाहिस्तेखानाने पुणे ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेलेल्या लाल महालात आपला मुक्काम ठोकला होता.
मात्र, स्वराज्यावर चाल करुन आलेल्या शाहिस्तेखानाचा फडशा पाडण्यासाठी महाराजांनी मोठा डाव आखला. महाराजांनी खानाच्या हालचाली आणि संरक्षणाची माहिती घेण्यासाठी आपले गुप्तहेर कामाला लावले.
महाराजांनी स्वराज्याची नासधूस करणाऱ्या शाहिस्तेखानावर थेट हल्ला करण्याचा धाडसी निर्णय घेतला. महाराजांनी ही योजना अत्यंत गुप्त ठेवली. त्यांनी निवडक, विश्वासू आणि जीवाला जीव देणाऱ्या सुमारे 400 मावळ्यांच्या साथीने खानावर हल्ल्याची योजना आखली.
महाराजांनी हा हल्ला करण्यासाठी रमजानचा महिना निवडला, जेव्हा मुघल सैनिक उपवासामुळे थकलेले आणि निवांत असतील. 5 एप्रिल 1663 रोजी रात्रीच्या वेळी हल्ला करण्याची योजना आखली. पुण्यात एका लग्नाच्या वरातीचा फायदा घेत मावळ्यांनी लाल महालात प्रवेश केला.
मावळ्यांनी अचानक हल्ला चढवला. झोपेत असलेल्या मुघल सैनिकांना काही कळायच्या आतच त्यांची कत्तल सुरु झाली. महाराजांनी थेट शाहिस्तेखानाच्या कक्षात प्रवेश केला. जीव वाचवण्यासाठी पळत असताना महाराजांनी शाहिस्तेखानावर तलवारीने हल्ला केला, ज्यात शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली गेली.
महाराजांच्या अशा अचानक हल्ल्यामुळे मुघलांची मोठी नाचक्की झाली. औरंगजेबाने तडकाफडकीने शाहिस्तेखानाची दक्षिणेतून बदली केली. या घटनेमुळे शिवाजी महाराजांचे धैर्य, रणनीती आणि गनिमी कावा जगाला पुन्हा एकदा कळाला.