Manish Jadhav
महाराजांच्या युद्धनीतीचा कणा म्हणजे 'गनिमी कावा'. शत्रूची संख्या मोठी असताना त्याच्यावर थेट हल्ला न करता, अचानक झडप घालणे, त्याचे नुकसान करणे आणि शत्रू सावरुन प्रतिकार करण्यापूर्वीच डोंगराळ भागात पसार होणे, हे महाराजांचे खास वैशिष्ट्य होते.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांची महाराजांना खडान् खडा माहिती होती. शत्रूला अशा ठिकाणी खेचून आणायचे जिथे त्याचे सैन्य आणि तोफा हतबल ठरतील (उदा. जावळीचे खोरे किंवा प्रतापगड), हे महाराजांच्या धोरणाचे मोठे यश होते.
"ज्यापाशी किल्ला, त्यापाशी राज्य" हे सूत्र महाराजांनी ओळखले होते. डोंगरदऱ्यांत अभेद्य किल्ले बांधून त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. प्रत्येक किल्ला हा शत्रूसाठी एक मोठे आव्हान आणि मराठा सैन्यासाठी सुरक्षित ढाल असायचा.
महाराजांचे सैन्य अतिशय चपळ होते. ओझे कमीत कमी ठेवून डोंगरदऱ्यांतून वेगाने हालचाली करण्यात त्यांचे मावळे तरबेज होते. 'रात्रीचा दिवस' करुन शत्रूवर तुटून पडण्याची क्षमता हे त्यांच्या सैन्याचे बलस्थान होते.
भारताला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे हे ओळखून महाराजांनी स्वराज्याचे स्वतंत्र आरमार उभे केले. "ज्यापाशी समुद्र, त्याचे राज्य" हे ओळखून त्यांनी जंजिरेकर सिद्दी आणि पोर्तुगीजांना रोखण्यासाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग उभारले.
बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखालील गुप्तहेर खाते हे महाराजांचे 'तिसरा डोळा' होते. शत्रूच्या गोटात काय चालले आहे, त्याचे बळ किती, रस्ते कोणते याची अचूक माहिती मिळाल्याशिवाय महाराज कधीही मोहिमेवर निघत नसत.
शत्रूच्या मनात धडकी भरवणे हे महाराजांचे एक कौशल्य होते. अफझलखानाचा वध असो किंवा शाहिस्तेखानाची बोटे छाटणे, या घटनांनी शत्रूच्या मनात मराठ्यांची प्रचंड दहशत निर्माण केली होती, ज्यामुळे अर्धी लढाई आधीच जिंकली जायची.
युद्धाच्या काळातही शेतकऱ्यांच्या पिकाला धक्का लागणार नाही, परस्त्रीचा आदर राखला जाईल आणि रयतेचे नुकसान होणार नाही, अशी कडक शिस्त महाराजांनी लावली होती. यामुळेच सामान्य जनता महाराजांना स्वतःचे रक्षक मानत असे.