Manish Jadhav
महाराजांनी स्वराज्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवण्यासाठी 'अष्टप्रधान मंडळा'ची निर्मिती केली. यात आठ प्रमुख मंत्री होते, ज्यांच्याकडे प्रशासन, संरक्षण, अर्थ आणि न्याय यांसारखी महत्त्वाची खाती सोपवण्यात आली होती.
महाराजांनी पायदळ आणि घोडदळ अशी सैन्याची विभागणी केली होती. सैनिकांच्या पदोन्नतीसाठी त्यांनी कडक शिस्त आणि गुणवत्तेचे निकष लावले होते. सैनिकांना पगार वेळेवर देण्याची पद्धत त्यांनी सुरु केली.
'गड-किल्ले हेच स्वराज्याचे आधारस्तंभ' हे ओळखून महाराजांनी 300 हून अधिक किल्ले बांधले किंवा दुरुस्त केले. प्रत्येक किल्ल्यावर हवालदार, सबनीस आणि कारखानीस असे तीन अधिकारी नेमले होते, जे एकमेकांवर नियंत्रण ठेवत असत.
समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंना रोखण्यासाठी महाराजांनी स्वतंत्र आरमार उभे केले. त्यांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग बांधले आणि परकीय आक्रमकांपासून स्वराज्याच्या सीमा सुरक्षित केल्या.
महाराजांनी जमिनीची मोजणी करुन त्यानुसार सारा (टॅक्स) ठरवला. दुष्काळात शेतकऱ्यांना सारा माफ केला जाई आणि बी-बियाणांसाठी कर्ज दिले जाई. "शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका," अशी त्यांची सैन्याला ताकीद होती.
महाराजांच्या राज्यात न्याय सर्वांसाठी समान होता. मग तो सामान्य माणूस असो वा मोठा वतनदार. गुन्हा सिद्ध झाल्यावर कठोर शिक्षा दिली जात असे, ज्यामुळे समाजात गुन्हेगारीवर वचक निर्माण झाला होता.
स्वराज्याच्या सुरक्षेसाठी महाराजांकडे 'बहिर्जी नाईक' यांच्या नेतृत्वाखाली अतिशय कार्यक्षम गुप्तहेर खाते होते. कोणत्याही मोहिमेपूर्वी शत्रूची इत्यंभूत माहिती काढण्यात हे खाते यशस्वी ठरत असे.
महाराजांनी कधीही स्वतःला 'मालक' समजले नाही, तर ते स्वतःला रयतेचा 'सेवक' मानत. स्त्रियांचा आदर करणे, परधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांचे संरक्षण करणे आणि कष्टकऱ्यांचे हित जोपासणे हे त्यांच्या प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट होते.